भाजपचे ‘मिशन कमळ’ अभियान जयेश सामंत, नीलेश पानमंद ठाणे : ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीतील दिग्गज आजी-माजी नगरसेवकांना गळाला लावत निवडणुकीच्या तोंडावर भाजपला एकामागोमाग एक धक्का देणाऱ्या शिवसेनेतील दुसऱ्या फळीतील नाराज आणि इच्छुकांना गळाला लावण्यासाठी भाजपने गेल्या दिवसांपासून ‘मिशन कमळ’ ही मोहीम हाती घेतली आहे. रामभाऊ म्हाळगी आणि स्वर्गीय आनंद दिघेंच्या स्वप्नातील ठाणे घडविण्यासाठी या तरुणांना साथ द्या असे आवाहन करत भाजपने शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात इच्छुक भरती मोहीम हाती घेतली आहे. ठाणे महापालिकेची आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली असून प्रभागांच्या आराखडय़ांबाबत प्राप्त झालेल्या हरकतींवर सुनावणी घेऊन प्रभाग रचना अंतिम केली जाणार आहे. या प्रक्रियेमुळे लवकरच महापालिका निवडणुका जाहीर होणार असून पक्ष फोडाफोडीच्या राजकारणालाही जोरात सुरुवात झाली आहे. दिवा शहरातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी असलेल्या आदेश भगत आणि निलेश पाटील यांना शिवसेनेने पक्ष प्रवेश देऊन भाजपला धक्का दिला होता. राज्यात ज्या पक्षाची सत्ता त्या पक्षाकडे निवडणुकांच्या तोंडावर आयारामांचा नेहमीच कल दिसून येतो. राज्याचे नगरविकास आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने यंदा शिवसेनेत घाऊक प्रमाणात नगरसेवकांचे प्रवेश सुरू आहेत. पक्षातील आणखी काही दिग्गज शिवसेनेत जाऊ नयेत यासाठी भाजपचे नेते प्रयत्नशील असले तरी ही घाऊक भरती लक्षात घेऊन शिवसेनेती दुसऱ्या फळातील पदाधिकाऱ्यांना गळाली लावण्याची योजना आता पक्षाने आखली आहे. वागळे इस्टेटमधील किसनगर भागातील शिवसेना शाखाप्रमुख समीर नार्वेकर, युवा सेना पदाधिकारी नीलेश लोहाटे आणि वर्तकनगर येथील भीमनगर भागातील शाखाप्रमुख तुकाराम माळकर यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्ष प्रवेश देऊन भाजपने या मोहिमेचा प्रारंभ केला आहे. सोमवारी झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी किसननगर आणि वर्तकनगरमधील पक्ष प्रवेश म्हणजे ठाण्यातील मिशन कमळला मिळालेला शुभसंकेत असल्याचे म्हटले. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रवेश करीत असून येत्या काळात पक्षप्रवेशाचे कार्यक्रम वाढणार आहेत. त्यामुळे ‘ये तो सिर्फ झाकी हे पिक्चर अभी बाकी है’, असे सूचक विधान भाजपचे शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांनी याच कार्यक्रमात बोलताना केले. ठाणे आणि शिवसेना हे अनेक दशकांचे समीकरण बनले आहे. जे कुणी नाराज भाजपच्या दिशेने निघाले आहेत ते लवकरच पक्षात परततील हा विश्वास आहे असे शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगतिले. पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी ठाणे शहरामध्ये शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्यासोबत काम केलेले अनेकजण शिवसेनेचे विद्यमान पदाधिकारी आहेत. त्यापैकी काही पदाधिकाऱ्यांना नगरसेवक होण्याची संधी मिळाली तर काहींना अद्यापही नगरसेवक पदासाठी उमेदवारी मिळू शकलेली नाही. प्रभागातील विद्यामान नगरसेवकांना उमेदवारी मिळत नसल्यामुळे काही पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. अशाच दुसऱ्या फळीतील नाराज पदाधिकाऱ्यांना हेरण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मोठय़ा प्रस्थापित नेत्यांना घेण्याऐवजी दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील कट्टर कार्यकर्त्यांना आम्ही पक्षात घेण्यासाठी उत्सुक आहोत. असे अनेक कार्यकर्ते आमच्या संपर्कात असून हेच कार्यकर्ते पक्षाची ताकद असतात. त्यामुळे येत्या काही दिवसांत अशा कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. - संजय केळकर, आमदार, भाजप