ठाणे : महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांच्या मुद्दय़ावरून भाजपने सत्ताधारी शिवसेनेविरोधात दंड थोपडले असतानाच, त्यापाठोपाठ आता रस्त्यावरील खड्डय़ांमुळे होणाऱ्या त्रासातून नागरिकांना दिलासा देण्याच्या मागणीसाठी भाजपने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. रस्त्यांवरील खड्डय़ांबाबत उच्च न्यायालयाने २०१५ मध्ये दिलेल्या निर्देशांची सरकारी यंत्रणांनी अंमलबजावणी करावी. तसेच युद्धपातळीवर खड्डे भरून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जनहित याचिकेत करण्यात आली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागांत पडलेल्या खड्डय़ांमुळे मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीमुळे नागरिक अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांनी शहरातील रस्त्यांवरील खड्डय़ांची पाहणी करून पालिका प्रशासनासह सत्ताधारी शिवसेनेवर टीका केली. आता भाजप लीगल सेलचे उपाध्यक्ष अॅड. प्रीतेश बुरड यांच्यामार्फत शहर उपाध्यक्ष सचिन बी. मोरे यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत राज्य सरकार, एमएमआरडीए, ठाणे महापालिका यांच्याबरोबरच नगरविकासमंत्री एकनाथ िशदे, महापौर नरेश म्हस्के यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे.