ठाणे महापालिकेच्या वेशीवर असलेल्या दिवा भागात गेल्या काही महिन्यांपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली असून याबाबत सातत्याने तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नसल्यामुळे, भाजपाने आज (बुधवारी) पालिकेवर मोर्चा काढला होता. या मोर्चात दिवावासियांनी मडकी फोडून तत्कालीन सत्ताधारी आणि महापालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.
यावळी माजी नगरसेवकाची माणसं एक लाख रुपये घेऊन बेकायदा नळ जोडणी देत असल्याचा आरोपही मोर्चेकरांनी केला. दरम्यान, पाणी पुरवठा योजनेची कामे महिनाभरात उरकून नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा करण्यात येईल आणि तोपर्यंत मागणीनुसार टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जाईल, असे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले आहे.
टंचाईग्रस्त भागासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन –
भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चात भाजपा पदाधिकाऱ्यांसह शेकडो दिवावासीय सहभागी झाले होते. दिवा परिसरातील पाणी टंचाईविरोधात भाजपाने यापूर्वी अनेकदा आंदोलने केली आहेत. त्यानंतरही पाणीटंचाई कायम राहिल्यामुळे भाजपाने नितीन कंपनी जंक्शनहून महापालिका मुख्यालयावर आज मोर्चा काढला. या मोर्च्यात नागरिकांनी घोषणाबाजी करत पाणीटंचाईच्या निषेधार्थ मडकी फोडून संताप व्यक्त केला. मोर्चातील शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. तसेच पाणीटंचाई दूर करण्याची मागणी केली. त्यावेळी टंचाईग्रस्त भागासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन आयुक्त डॉ. शर्मा यांनी दिले.
करोना काळ आणि ठेकेदाराचे देयकं थकल्यामुळे कामास उशीर झाल्याची कबुली –
दिवा भागासाठी ३५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा मंजुर आहे. सद्यस्थितीत २९ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होत आहे. जलवाहीन्यांची कामे पुर्ण झाल्यानंतर या भागांचा पाणी पुरवठा सुरळीत होईल. करोना काळ आणि ठेकेदाराचे देयक थकल्यामुळे कामास उशीर झाल्याची कबुली पालिका अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. त्यावर जलवाहीन्यांची कामे पुर्ण होईपर्यंत मंजुर असलेला ३५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्याची तसेच ठेकेदाराची देयके देऊन लवकर काम पुर्ण करण्याची मागणी आमदार चव्हाण यांनी केली. त्यावर पाणी पुरवठा योजनेची कामे महिनाभरात उरकून नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.
जलकुंभाच्या उभारणीसाठी स्वत:च्या मालकीची १० गुंठे जागा देणार – नगरसेवक अशोक पाटील
तसेच भविष्यातील गरज ओळखून जलकुंभासाठी आरक्षित असलेल्या जागा ताब्यात घेऊन त्याठिकाणी जलकुंभांची उभारणी करण्याची मागणीही आमदार चव्हाण यांनी यावेळी केली. पाणी सो़डणाऱ्या व्यक्तींची बदली आणि रात्री १२ वाजेनंतर पाणी सोडू नये अशी मागणीही त्यांनी केली. तर माजी नगरसेवक अशोक पाटील यांनी जलकुंभाच्या उभारणीसाठी स्वत:च्या मालकीची १० गुंठे जागा देण्याची घोषणा यावेळी केली.
…तर आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करणार – डावखरे
“दिव्यातील नळपाणी योजना आणि रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, मुलभूत पाण्याची सुविधा सोडविण्यात अपयश आले आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्याची राज्यातील सत्ताधाऱ्यांची भावनाच नसून, महापालिका प्रशासनाने पाणीटंचाईवर जनतेचा अंत पाहू नये. यापुढील काळात हा प्रश्न सुटला नाही तर आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले जाईल.” असा इशारा आमदार निरंजन डावखरे यांनी दिला. अनधिकृत बांधकामांना पाणी मिळत असताना, रहिवाशी पाण्यापासून वंचित आहेत, अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.
तहानलेल्या दिव्यासाठी आणखी लढा तीव्र केला जाईल – आमदार संजय केळकर
याचबरोबर, “मडकी फोडून आंदोलन केल्याने कधीतरी राज्यातील सत्ताधारी व प्रशासनाचे डोके ठिकाणावर येईल, अशी अपेक्षा आहे. तहानलेल्या दिव्यासाठी आणखी लढा तीव्र केला जाईल.” असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला. दिव्यातील जनतेसाठी बांधलेले ई-टॉयलेट तोडले गेले. जनतेविषयी आस्था नसल्याची टीकाही त्यांनी केली.
याशिवाय,दिव्यात पाणी पुरवठ्यासाठी १८ इंची जलवाहीनी आहे. या जलवाहिनीवरून बेकायदा नळजोडणी दिली जात आहे. माजी नगरसेवकाची माणसे एक लाख रुपये घेऊन ही नळ जोडणी करून देतात, असा गंभीर आरोप दिवा मंडल अध्यक्ष रोहीदास मुंढे यांनी केला. तसेच टँकर माफीया देखील पाणी चोरुन विकत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.