उल्हासनगर येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण बिल भरणा केंद्रातील रक्कम बँकेत भरण्यासाठी नेमलेल्या खासगी कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने पाच लाखांची रोकड लंपास केल्याची घटना घडली.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस तपास करत आहेत. उल्हासनगर येथील गायकवाड पाडा परिसरात महाराष्ट्र राज्य वीज वितरण बिल भरणा केंद्र आहे. या केंद्रात जमा होणारी रक्कम आरसीआय कंपनीच्या सहाय्याने उल्हासनगर ४ मधील कॅनरा बँकेत भरतो, असे सांगून नथ्थू मोरे (३२) याने हे काम मिळविले. त्यानंतर केंद्रामधील रोख रक्कम पाच लाख सत्तावन्न हजार आठशे रुपयांची रोख रक्कम बँकेत भरण्यासाठी घेऊन गेला. परंतु ही रक्कम बँक खात्यामध्ये जमा न करता त्याने रकमेसह पोबारा केला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.