मुंबईतील कांदिवली विभागातील एका दुचाकीस्वाराने शिरस्त्राण न घातल्याने तेथील वाहतूक विभागाने दुचाकीस्वाराला ऑनलाइन पद्धतीने इ चलन दंडाची पावती पाठवली आहे. ही चलन पावती संबंधित दुचाकीस्वाराला न जाता ती कल्याण मधील द्वारली गावातील एका रिक्षाचालकाला आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. कल्याण पूर्वेतील द्वारली गावात गुरुनाथ चिकणकर हे रिक्षा चालक म्हणून काम करतात. गुरुवारी गुरुनाथ यांना त्यांच्या मोबाईलवर ई चलन दंडाची पावती आली. वाहतूक भंग केला नसताना आपणास वाहतूक विभागाकडून दंडाची पावती का आली म्हणून रिक्षा चालक गुरुनाथ यांनी वाहतूक विभागाच्या ई चलन ॲप वर जाऊन तपासणी केली असता., त्यांना ती दंडाची पावती आपली नसल्याचे समजले. मुंबईतील कांदिवली विभागात एका दुचाकीस्वाराने शिरस्त्राण घातले नसल्याने वाहतूक विभागाने त्याच्या वाहन क्रमांकावरून त्या दुचाकी स्वाराला ऑनलाइन पद्धतीने ई चलन द्वारे पाचशे रुपये दंडाची पावती पाठवली होती. गुरुनाथ यांनी स्थानिक वाहतूक विभागाकडे यासंदर्भात तक्रार केली तेव्हा त्यांना तुम्ही ठाणे वाहतूक विभागाकडे जाऊन हा विषय मार्गी लावा असे सांगण्यात आले. आपली चुकी नसताना आपण रिक्षा बंद ठेवून का ठाणे येथे जावे कसा प्रश्न चालक गुरुनाथ चिकणकर यांनी केला आहे. चुक एकाची आणि भुर्दंड दुसऱ्याला असा प्रकार वाहतूक विभागाकडून झाल्याने ही चलन पद्धतीतील तांत्रिक दोष दूर करावेत अशी मागणी रिक्षाचालकांकडून वाहतूक विभागाकडे करण्यात येणार आहे.