लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: शास्त्रीय संगीत शिकताना चांगले गुरू मिळणे ही खूप भाग्याची गोष्ट असते. अशा गुरुंकडून चांगले शास्त्रीय संगीत शिकण्याबरोबरच मनुष्य कोण असतो आणि माणुसकी काय असते याची आदर्शवत शिकवणी मिळते. आपल्या वाट्याला हे योग आले म्हणून आपण चतुरंग संगीत पुरस्काराचे मानकरी ठरलो, असे मनोगत चतुरंग संगीत पुरस्कार मिळविणाऱ्या यशस्वी शास्त्रीय संगीत गायक, कलाकारांनी येथे व्यक्त केले.

चतुरंग प्रतिष्ठानच्या ४९ व्या वर्धापनदिनानिमित्त चैत्रपालवी संगीतोत्सव कार्यक्रमाचे डोंबिवलीतील सुयोग मंगल कार्यालयात आयोजन केले होते. या कार्यक्रमात म्हैसकर फाऊंडेशन पुरस्कृत चतुरंग संगीत सन्मान पुरस्कार पंडित नित्यानंद हळदीपूर यांना, चतुरंग संगीत शिष्यवृत्ती युवा गायिका सावनी गोगटे यांना देण्यात आला. यावेळी म्हैसकर फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर, ज्येष्ठ पत्रकार डाॅ. उदय निरगुडकर, निवड समिती सदस्य ज्येष्ठ गायिका शुभदा पावगी, पंडित चंद्रशेखर वझे, प्रवीण करकरे उपस्थित होते.

हेही वाचा… ठाकुर्लीतील नागरिकांना फसविणारा जवाहिर राजस्थान मधून पाच वर्षांनी अटक

पं. हळदीपूरकर यांना ७५ हजार रुपये रोख, सन्मानपत्र, गायिका सावनी हिला २५ हजार रुपये आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
प्राजक्ता काकतकर यांच्या गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांना अभिजित काकतकर यांनी तबल्याची, श्रेयस गोवित्रीकर यांनी पेटीची साथ दिली. चिराग कट्टी यांच्या सतार वादनाचा कार्यक्रम यावेळी झाला. त्यांना रोहित देव यांनी तबला साथ दिली.

हेही वाचा… डोंबिवलीत खोदलेल्या रस्त्यांनी नागरिक हैराण; शिवमंदिर रस्त्यावरील स्मशानभूमीला कोंडीचा विळखा

आपल्यावर संगीत संस्कार मुंबईतील पार्ले टिळक शाळेत झाले. शाळेतून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे आपल्यातील सांगीतिक गुण आपणास दिसले. सांगीतिक वाटचालीत चांगले गुरू मिळत गेले. युवा गटात असताना पन्नालाल घोष यांचा सहवास मिळाला. गुरू अन्नापूर्णदेवी यांच्याकडून आपण मनुष्य कोण आणि माणुसकी काय असते ते शिकलो. अशा गुरुंकडून संगीत बघण्याची दृष्टी मिळते. ती आपणास मिळाली, असे पंडित हळदीपूर यांनी मनोगतात सांगितले.

हेही वाचा… कल्याणमध्ये ‘द केरला स्टोरी’ पाहण्यासाठी तरुणी, महिलांची गर्दी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समाज जगविण्यात वाढविण्यात कलेचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे दानशुरांनी कला जगविण्यात महत्वाचा पुढाकार घेतला. अनेक आक्रमणे देशावर झाली. मंदिरे, विद्यापीठे उध्वस्त केली. पण मौखिक परंपरेतील शास्त्रीय संगीत कला मात्र कोणी उदध्वस्त करू शकले नाही. ही कला उलट बहरत गेली. कलेला जात, धर्म नाही. त्यामुळे शास्त्रीय संगीत सर्वांगाने बहरत गेले, असे डाॅ. निरगुडकर यांनी सांगितले.