राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे महापालिका मुख्यालयात उद्या दुपारी विशेष बैठक घेणार आहेत. या बैठकीत त्यात ते शहरातील विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या हस्ते विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेची बिघडलेली आर्थिक परिस्थिती तसेच आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही बैठक महत्वाची मानली जात आहे. हेही वाचा- कल्याण रेल्वे स्थानकाजवळील वाहतूक कोंडीवर उपाय; कल्याण आगारातील बस दुर्गाडी, मुरबाड गणेश घाट येथून सोडण्याचा निर्णय शिवसेनेतील बंडखोरीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्यातून मोठा पाठींबा मिळाला असून हा जिल्हा त्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आहे. पुढील वर्षात महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत कळवा- मुंब्रा मतदार संघाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन विचारे यांचेही आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. ठाण्याचा गड राखण्याचे आव्हान शिंदे यांच्यापुढे असल्यामुळे त्यांनी ठाण्यावर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. आर्थिक परिस्थिती बिकट झालेल्या महापालिकेला रस्ते तसेच विविध पायाभूत प्रकल्पांसाठी त्यांनी मोठा निधी उपलब्ध करून देत विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न केला आहे. नवी मुंबईच्या धर्तीवर ठाण्याचा विकास आणि सुशोभिकरण व्हावा अशी शिंदे यांनी इच्छा असून त्यासाठी त्यांनी आयुक्त अभिजीत बांगर यांची ठाणे महापालिकेत नियुक्ती केली आहे. हेही वाचा- भात खरेदीत घोटाळ्यात राष्ट्रवादीच्या एका लोकप्रतिनिधीचा सहभाग; भाजप आमदार संजय केळकर यांचा गंभीर आरोप बांगर यांनीही शहरातील विकास आणि सुशोभिकरण कामांना गती देण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर ठाणेकरांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी शिंदे यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून पालिकेला निधी देऊ केला आहे. काही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु झाली असली तरी त्या कामांच्या दर्जाविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर, काही ठिकाणी कामेच सुरु झालेली नाही. त्यामुळे या सर्व कामांचा आढावा मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून घेतला जाणार असून महापालिकेची बिघडलेली आर्थिक परिस्थिती तसेच आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे.