केंद्र सरकारच्या नगरविकास विभागाने स्वच्छतेचा अमृत महोत्सव साजरा करताना ‘इंडियन स्वच्छता लीग’ हा राष्ट्रीय उपक्रम जाहीर केला असून त्याचाच एक भाग म्हणून ठाणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी लोकसहभागातून स्वच्छता विषयक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या उपक्रमांची सुरूवात १७ सप्टेंबर रोजी उपवन तलाव ते येऊर गाव या भागात मानवी साखळी आणि श्रमदानाने करण्यात येणार आहे. या निमित्ताने शालेय – महाविद्यालयीन विद्यार्थी व युवक, ठाणेकर नागरिक यांच्या सहभागाने ‘ठाणे टायगर्स’ या अभिनव उपक्रमाचाही आरंभ होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ‘फॉक्सकॉन’ गेला म्हणून बोंबा ठोकणाऱ्यांकडून यापूर्वी मराठी उद्योजकांची छळवणूक ; उद्योग मंत्री उदय सामंत यांची टीका 

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या पंधरवड्यात स्वच्छता अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यामध्ये ‘इंडियन स्वच्छता लीग’ हा स्वच्छता विषयक देशव्यापी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यात, देशभरातील १८०० हून अधिक शहरे सहभागी होत आहेत. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या पंधरवड्यात स्वच्छता विषयक उपक्रम राबविले जाणार आहेत. लोकसहभागातुन हे उपक्रम राबविले जाणार असून स्वच्छता कार्यात तरूणाईचा सहभाग महत्त्वाचा असणार आहे. त्यासाठी कचरा विरोधात युवक (#Youth V/s Garbage) ही टॅगलाईन जाहीर करण्यात आली आहे. या माध्यमातून प्रत्येक शहराने आपला संघ तयार करणे व या संघाचा कर्णधार जाहीर करणे अपेक्षित आहे. त्यानुसार, ठाणेकरांचे प्रतिनिधित्व करणारा ‘ठाणे टायगर्स’ हा संघ जाहीर करण्यात आला आहे. वाघ हे पर्यावरणीय समतोलाचे प्रतीक असल्याने त्या वाघाच्या तडफेने आणि सर्वसमावेशकेतेने ठाणेकर स्वच्छतेचे धेय्य गाठतील, अशा उद्देशाने संघाच्या बोधचिन्हाची रचना करण्यात आली आहे. या उपक्रमात सक्रिय सहभाग दर्शविण्यासाठी, प्रत्येक ठाणेकर नागरिकाने केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पोर्टलवरील लिंकवर (https://innovateindia.mygov.in/swachhyouthrally/) आपली नोंदणी करून या स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले.

येऊर येथून उपक्रमाला सुरुवात
शनिवार, १७ सप्टेंबर रोजी उपवन तलाव परिसरात संपन्न होणाऱ्या ‘इंडियन स्वच्छता लीग’च्या कार्यक्रमात शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ठाणेकर युवकांनीही याप्रसंगी स्वयंस्फुर्तीने उपस्थित राहून राष्ट्रीय स्वच्छता उपक्रमात आपला सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही शर्मा यांनी केले आहे. तसेच, महापालिका क्षेत्रातील ७००हून अधिक शाळांच्या विद्यार्थ्यांची १५ आणि १६ सप्टेंबर रोजी याच विषयावर चित्रकला स्पर्धाही होणार असल्याची माहिती डॉ. शर्मा यांनी दिली.

हेही वाचा >>> अंबरनाथ : घरात घुसनू वयोवृद्ध महिलेचे दागिने लुटले

उपवन तलाव ते येऊर गाव या मार्गावर ७.५ किमी अंतराची सुमारे ७ हजार ५०० नागरिकांचा सहभाग असलेली मानवी साखळी तयार केली जाणार आहे. हे नागरिक श्रमदान करून त्यांच्या आसपासच्या परिसरातील कचरा गोळा करतील आणि स्वच्छता अमृत महोत्सवात सहभागी होतील. त्याच बरोबर, जनजागृती करणारी बाईक रॅली, स्वच्छता दूतांना विविध सामग्रीचे वाटप, ठाणे स्वच्छता लीगचे उद्घाटन, कचरावेचकांची आरोग्य तपासणी, स्वच्छ खाडी अभियान, शाळा स्वच्छता दिंडी, शालेय विदयार्थी आणि ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांची चित्रकला स्पर्धा याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली.

ठाणे स्वच्छता लीग
‘इंडियन स्वच्छता लीग’च्या धर्तीवर ठाणे महापालिकेने प्रभाग समिती स्तरावर ‘ठाणे स्वच्छता लीग’चे आयोजन केले आहे. त्यात नऊ प्रभाग समित्यांचे नऊ संघ सहभागी होतील. या संघांना नौपाडा नायक, मानपाडा मावळे, उथळसर योद्धा, लोकमान्य लिजंड्स, दिवा डेअरडेव्हिल्स, मुंब्रा मस्केटिअर्स, कळवा नाईट्स, वागळे वॉरिअर्स, वर्तक वीर अशी नावे देण्यात आली आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cleanliness activities through public participation at different places in thane city amy
First published on: 15-09-2022 at 10:44 IST