ठाणे शहराच्या सौंदर्यीकरणात स्वच्छतेला प्राधान्य देण्याबरोबरच व्यापकतेवर भर द्यावा आणि बारकाईने नियोजन करावे, अशा सूचना ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. शहर सौंदर्यीकरण करताना परिसरानुरुप समर्पक चित्रे असावीत याची काळजी घेण्याबरोबरच उत्तम दर्जाचे काम करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिले.

हेही वाचा >>>देवी विसर्जन निमित्ताने कळवा, भिवंडीत वाहतूक बदल

ठाणे शहरातील स्वच्छतेविषयी कामांचा आयुक्त बांगर यांनी सोमवारी विस्तृत आढावा घेतला. त्यापाठोपाठ त्यांनी मंगळवारी शहरातील सुशोभीकरणाची स्थिती, त्याचे नियोजन या सर्वाचा आढावा घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शहर सुशोभीकरणाविषयीच्या सूचना आणि संकल्पना लक्षात घेऊन उत्तम दर्जाचे काम करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीस, शहर अभियंता प्रशांत सोनाग्रा तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा >>>“कळवा-मुंब्रा मतदारसंघ डोंबिवलीपेक्षा लाख पटीने बरा”; जितेंद्र आव्हाड यांची भाजपा आमदारावर खोचक टीका

ठाणे शहराच्या सौंदर्यीकरणात स्वच्छतेला प्राधान्य देण्याबरोबरच व्यापकतेवर भर द्यावा आणि बारकाईने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. स्वच्छ सर्वेक्षणात सातत्याने उत्तम कामगिरी करीत असलेल्या नवी मुंबईतील यशस्वी झालेल्या प्रयोगांचा दाखला त्यांनी यावेळी दिला. पहिल्या टप्प्यात भिंती चित्रे (वॉल आर्ट), दुसऱ्या टप्प्यात कारंजी व शिल्प आणि तिसऱ्या टप्प्यात शहराची प्रवेशद्वारे असे सुशोभीकरण कार्यक्रमाचे नियोजन करावे. त्यासाठी, प्रस्तावित कामाची फेररचना या टप्प्याप्रमाणे करावी, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. या बैठकीत सादरीकरण करण्यात आलेल्या वेगवेगळ्या संकल्पनांचा उपयोग करून सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यांनी संकल्पना तयार करावी. शहर सौंदर्यिकरण करताना परिसरानुरुप समर्पक चित्रे, असावीत याची काळजी घ्यावी आणि त्याचबरोबर कामे उत्तम दर्जाची होतील, हे कटाक्षाने पहावे, असेही त्यांनी सांगितले.