scorecardresearch

काटई बदलापूर मार्गावरील जीवघेणे खड्डे बुजवा ,प्रवासी संतप्त; अचानक येणाऱ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांची कसरत

काटई बदलापूर राज्यमार्गावर ग्रीनलीफ हॉटेलच्या समोर पडलेला भला मोठा खड्डा सध्या वाहन चालकांना त्रासदायक ठरतो आहे.

pathole on katai badlapur road
काटई बदलापूर मार्गावरील जीवघेणे खड्डे बुजवा ,प्रवासी संतप्त

अंबरनाथः काटई बदलापूर राज्यमार्गावर ग्रीनलीफ हॉटेलच्या समोर पडलेला भला मोठा खड्डा सध्या वाहन चालकांना त्रासदायक ठरतो आहे. अंबरनाथहून काटईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर मधोमध पडलेल्या या खड्ड्यांमुळे या मार्गावर कोंडी होते आहे. अंबरनाथहून वाहनाने वेग पकडल्यानंतर अचानक येणाऱ्या या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा तोल बिघडत असून त्यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त होते आहे. हा खड्डा बुजवण्याची मागणी होते आहे.

हेही वाचा >>>कल्याणमध्ये जमीन व्यवहारात मुंबईतील विकासकाची २२ लाखाची फसवणूक

मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यासह त्यापुढील प्रवासासाठी बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण ग्रामीणच्या नागरिकांना काटई बदलापूर हा मार्ग फायद्याचा ठरतो. बदलापूर, अंबरनाथहून तळोजा, पनवेल, खारघर या भागात जाण्यासाठी याच मार्गावरून खोणी नाक्यापर्यंत जाता येते. या मार्गावरच कल्याण शहरातून येणारी वाहतुकही मोठी आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याला खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून या रस्त्याची देखभाल दुरूस्ती केली जाते. पावसाळ्यात या रस्त्याला दरवर्षी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडतात. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे जिकीरीचे होत असते. सध्या या मार्गाच्या खोणी ते काटई या मार्गिकेच्या कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. तर काटई ते खोणी या मार्गिकेचे काम यापूर्वीच पूर्ण करण्यात आले आहे. मात्र नेवाळी ते अंबरनाथ या पट्ट्यात ग्रीनलीफ हॉटेलसमोर गेल्या काही दिवसांपासून एक मोठा खड्डा वाहनचालकांसाठी डोकेदुखी बनला आहे. ग्रीनलीफ हॉटेलच्या समोर अंबरनाथ ते नेवाळी या मार्गिकेवर हा खड्डा पडला आहे. या खड्ड्याची लांबी रूंदीने संपूर्ण रस्ता व्यापला आहे. अंबरनाथहून वेगाने येणाऱ्या वाहनांना या खड्ड्यांचा मोठा फटका बसतो आहे. खड्डा वाचवण्यासाठी अचानक ब्रेक लावावा लागत असल्याने लहान मोठे अपघात होत आहेत. तर काही वाहनचालक हा खड्डा वाचवण्यासाठी रस्त्याखालून वाहने नेत आहेत. त्यामुळे अपघाताची भीती व्यक्त होते आहे. तसेच या खड्ड्यामुळे येथे अवजड वाहनांची मोठी कोंडी होते आहे. त्यामुळे हा खड्डा वाहनचालकांसाठी धोकादायक ठरू लागला आहे. रात्रीच्या वेळी येथे जीवघेणे अपघात होण्याची भीती असून हा खड्डा तातडीने बुजवावा अशी मागणी प्रवाशांकडून केली जाते आहे.

हेही वाचा >>>डोंबिवलीत समीर वानखेडे यांचे उद्या व्याख्यान

सांडपाण्यामुळे खड्डे कायम
काटई बदलापूर मार्गावर बदलापूरकडे जाणाऱ्या मार्गिेकेवर नेवाळी नाक्याजवळ असंख्य चाळी उभ्या राहिल्या आहेत. या चाळींमधून येणारे सांडपाणी थेट मार्गावर येथे. त्यामुळे या भागात खड्डे पडतात. खड्डे बुजवले तरी पाण्यामुळे ते पुढे उगवतात. त्यामुळे एमआयडीसीने येथे पेव्हर ब्लॉक लावले आहेत. मात्र त्यानतंरही खड्डे पडत असल्याने वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागते आहे. या सांडपाण्यावर नियंत्रण नसल्याने एमआयडीसी प्रशासनाही हतबल झाल्याचे चित्र आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 16:37 IST
ताज्या बातम्या