औरंगाबादमध्ये झालेल्या अपघातानंतर रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणारे ठाण्यातील काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. १५ ऑगस्ट हा त्यांचा जन्म दिवस असून यांच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. औरंगाबाद येथील सिग्मा रुग्णालयातील डॉक्टरांनी मध्यरात्री त्यांचे निधन झाल्याचे जाहीर केले. पूर्णेकर यांच्या रुपात ठाण्यात काँग्रेसला एक नवा चेहरा मिळाला होता. त्यांच्या निधनाने केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे तर सामाजिक क्षेत्रात देखील हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

औरंगाबादमधील येथून मुंबईकडे परत येत असताना काँग्रेसचे नेते संजय चौपाने आणि बाळकृष्ण पूर्णेकर यांच्या गाडीला अपघात झाला होता. यामध्ये संजय चौपाने यांचा जागीच मृत्यू झाला. तर पूर्णेकर यांची प्रकृती चिंताजनक होती. दोन दिवस ते रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते. मात्र सोमवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मावळली. पूर्णेकर यांचा मृतदेह संध्याकाळी ५ वाजेपर्यंत कोलशेत येथील त्यांच्या राहत्या घरी आणण्यात येणार असून रात्री ९ वाजता त्यांची अंतयात्रा निघणार आहे. या घटनेमुळे घोडबंदर रोडवरील गोविंदा पथक तसेच आयोजकांमधील हंडीचा उत्साह ओसरला आहे.