पारदर्शक कारभाराच्या दृष्टीने ठाणे महापालिकेचा निर्णय
ठाणे महापालिका क्षेत्रात विकास कामे करणाऱ्या ठेकेदारांचे बिले १ ऑक्टोबरपासून आरटीजीएस आणि ईसीएस प्रणालीद्वारे थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.
महापालिकेचा कारभार अधिकाधिक पारदर्शक व्हावा या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला असल्याचे महापालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी महापालिका धनादेशाच्या माध्यमातून ठेकेदारांची बिले देत होती. आता ही प्रक्रिया पूर्णपणे बंद करून नव्या प्रणालीनुसार ठेकेदारांच्या बँक खात्यामध्ये बिलाची रक्कम जमा केली जाणार आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामे झाल्यानंतर कंत्राटदार, ठेकेदारांना त्यांची बिलांची रक्कम पूर्वी धनादेशाद्वारे देण्यात येत होती.
परंतु ही प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ स्वरूपाची होती. ठेकेदारांना त्यासाठी वारंवार महापालिकेच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. यामध्ये मोठय़ा प्रमाणात वेळ वाया जात होता.
त्यामुळे यापुढे ठेकेदारांची देयके आरटीजीएस आणि ईसीएस प्रणालीद्वारे थेट त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत.
अशा प्रकारचा निर्णय घेणारी ठाणे महानगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ठरली आहे.