२१ महिन्यांपासून रुग्णालयात शव स्वीकारत नसल्याने देहदान मंडळाची अडचण भगवान मंडलिक डोंबिवली : करोना विषाणूची महासाथ सुरू झाल्याने गेल्या दोन वर्षांपासून देहदान करणाऱ्या व्यक्तींचे शव कळव्याचे छ. शिवाजी रुग्णालय, के.ई.एम. आणि जे.जे. रुग्णालयांमधील देहदान विभागात स्वीकारले जात नाहीत. देहदान करणाऱ्याचे निधन झाले तर त्याचे शव सर्व प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या करून स्वीकारावे, अशी मागणी करूनही त्याला प्रतिसाद मिळत नाही, अशी खंत डोंबिवलीतील दधिची देहदान मंडळाचे संस्थापक गुरुदास तांबे यांनी व्यक्त केली. दधिची देहदान मंडळामार्फत ३६ वर्षांत २,५०० हून अधिक रहिवाशांनी देहदान केले. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांना या शवाच्या माध्यमातून मानवी शरीर शास्त्राचा अभ्यास करता येतो, असे तांबे यांनी सांगितले. एका वर्षांत १५ ते १८ विविध गटातील रहिवासी देहदानासाठी दधिची देहदान मंडळाकडे नोंदणी करतात. महाराष्ट्राच्या विविध भागातील रहिवासी देहदानासाठी दधिची देहदान मंडळाकडे संपर्क साधतात. रत्नागिरी, रायगड, सावर्डे, डेरवण, चिपळूण परिसरातील रहिवाशांनी दधिची मंडळाकडे नोंदणी केली आहे. ज्या भागात वैद्यकीय महाविद्यालय नाही, त्या भागातील सरकारी रुग्णालयांमध्ये देहदानाच्या सुविधा नसतात. अशी मंडळी दधिची मंडळाकडे संपर्क करून ठाणे, मुंबईत आपले देहदान होईल अशी व्यवस्था करतात, असे तांबे म्हणाले. नोंदणी केलेल्या व्यक्तीला संकेतांक दिला जातो. त्या व्यक्तीची माहिती कळवा येथील छ. शिवाजी रुग्णालयातील तिसऱ्या माळय़ावरील शव स्वीकारणाऱ्या विभागाला दधिची मंडळाकडून दिली जाते. रुग्णालय, दधिची मंडळ यांच्या संयुक्त संमतीचे देहदानाचे एक ओळखपत्र देहदान करणाऱ्या व्यक्तीला दिले जाते. ते ओळखपत्र सोबत असेल तर त्या व्यक्तीचा कोणत्याही भागात अपघात किंवा अन्य कारणाने मृत्यू झाला तर त्या व्यक्तीने देहदान केले आहे ही माहिती पोलीस, त्या भागातील सरकारी रुग्णालयातील डॉक्टर यांना कळते, असे तांबे यांनी सांगितले. रुग्णालये शासन आदेश येत नाहीत तोपर्यंत देहदानासाठीचे शव स्वीकारण्यास तयार नाहीत. या महत्त्वपूर्ण विषयात शासनाने हस्तक्षेप करून सर्व प्रकारच्या चाचण्या करून शव रुग्णालयात स्वीकारण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी तांबे यांनी केली आहे. करोना महासाथ सुरू झाल्यापासून कोणतेही शव जतन करू ठेवू नये असे जागतिक आरोग्य संघटनेच्या आदेशाप्रमाणे शासनाच्या सूचना आहेत. देहदानाच्या शवातील रक्तघटक (एम्ब्लामिंग) काढून शव जतन करावे लागते. या प्रक्रिया करण्यास बंदी आहे. देहदान विभागात एखादे शव घेतले ते करोनाबाधित असेल तर तेथील कर्मचाऱ्यांना बाधा होऊ शकते. तिसरी लाट झाल्यापासून असे शव घेणे बंद केले आहे. कळवा छ. शिवाजी रुग्णालयात जे रुग्ण दाखल होते, ज्यांनी देहदान केले आहे अशा व्यक्तीचा मृत्यू झाला तर सर्व चाचण्यांसह ते शव करोनाबाधित नाही याची खात्री करून मगच ते शव सध्या जतनासाठी स्वीकारले जाते. शासन आदेशाशिवाय देहदानाचे शव स्वीकारले जाणार नाहीत. - डॉ. सुचितकुमार कामखेडकर, विभागप्रमुख शरीररचना शास्त्र छ. शिवाजी रुग्णालय, कळवा (ठाणे) क देहदानासाठी जे. जे. रुग्णालयात समिती आहे. या समितीच्या निकषानुसार देहदानाचे शव स्वीकारले जातात. विविध प्रकारच्या व्याधी, रोगबाधित शव देहदानासाठी स्वीकारले जात नाहीत. देहदानानंतर त्या शवाच्या विविध वैद्यकीय चाचण्या, दोन वर्षांपासून करोना चाचणी (आरटीपीसीआर) नकारात्मक असेल तर ते जतन आणि अभ्यासासाठी स्वीकारले जातात. - डॉ. नितीश नाडकर्णी, माजी विद्यार्थी जे. जे. रुग्णालय, मुंबई