ठाणे : ठाणे जिल्ह्यात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून वाढू लागलेला करोनाचा संसर्ग दोन महिन्यानंतर म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कमी होऊ लागल्याचे चित्र आहे. संपूर्ण जिल्ह्यात दररोज १५ ते ३० च्या आसपास रुग्ण आढळून येत असून यापूर्वी शंभरहून अधिक आढळून येत होते. याशिवाय, सक्रिय रुग्णसंख्या सातशेवरून तीनशेवर आली आल्याने शहरात करोनाचा संसर्ग ओसरू लागल्याचे दिसून येते. ठाणे जिल्ह्यात यंदाच्या फेब्रुवारी महिनाअखेरपर्यंत करोनाचा संसर्ग आटोक्यात होता. मार्च महिना सुरू होताच जिल्ह्यात करोनाचा संसर्ग अचानकपणे वाढू लागला. ठाणे जिल्ह्यात दररोज शंभरहून अधिक रुग्ण आढळून येत होते. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ७२० इतकी झाली होती. त्यापैकी २६६ इतके रुग्ण एकट्या ठाणे शहरातील होते. यामुळे ठाणे शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याचे चित्र होते. शहरात रुग्ण मृत्यूचे प्रमाणही वाढले होते. शहरात आतापर्यंत सातजणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. ठाणे शहरापाठोपाठ नवी मुंबई शहरात २२० सक्रीय रुग्ण होते. करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे संपूर्ण जिल्ह्याची आरोग्यचिंता वाढली होती. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा तसेच पालिका प्रशासनांनी पाऊले उचलली होती. हेही वाचा - कल्याण पूर्वेत आडिवली-ढोकळीत बेकायदा इमारतींचे मल-सांडपाणी रस्त्यांवर; दुर्गंधीने रहिवासी, प्रवासी हैराण करोना रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन जिल्हा तसेच पालिका प्रशासनाने रुग्ण उपचारासाठी स्वतंत्र कक्ष तयार केले होते. जिल्ह्यात करोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली होती. रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांची चाचणी केली जात होती. ठाणे शहरात दररोज २५०० च्या आसपास करोना चाचण्या करण्यात येत आहेत. जिल्हा तसेच पालिका प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून संसर्ग कमी होऊ लागला आहे. संपूर्ण जिल्ह्यात दररोज १५ ते ३० च्या आसपास रुग्ण आढळून येत आहे. जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या ७२० इतकी होती. संख्येत घट होऊन ती तीनशेवर आली आहे. ठाणे आणि नवी मुंबई शहरात सक्रीय रुग्ण निम्म्याने कमी झाल्याचे दिसून येते. ठाणे शहरात सक्रीय रुग्णसंख्या १११ तर नवी मुंबईतील सक्रीय रुग्णसंख्या ९६ इतकी आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. शहर आधीचे सक्रीय रुग्ण आताचे सक्रीय रुग्णठाणे २६६ १११कल्याण-डोंबिवली४७ १६नवी मुंबई २२० ९६उल्हासनगर६२३८भिवंडी १० ३मिरा-भाईंदर४६ २०अंबरनाथ ००बदलापूर५२ठाणे ग्रामीण३४२२