पाच रुपये किलोवरून दर ३० रुपये किलोवर; अन्य राज्यांतील वाढत्या मागणीचा परिणाम चिकूच्या बागांसाठी प्रसिद्ध असलेल्या डहाणू पट्टय़ातील चिकूंची चव चाखणे सर्वसामान्यांसाठी दिवसेंदिवस कठीण झाले आहे. घोलवडच्या प्रसिद्ध चिकूचे दर वाढले असून एरवी पाच रुपये किलोने मिळणारा चिकू तीस रुपये किलोवर पोहोचला आहे. या वाढलेल्या भावामुळे सर्वसामान्य ग्राहक हवालदिल झाले असले तरी उत्पादक शेतकरी खूष झाले आहेत. अतिवृष्टीमुळे झालेले कमी उत्पादन आणि इतर राज्यांतून वाढलेलीे मागणीे यामुळे चिकूचे भाव वाढल्याचे चिकू उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. पालघर जिल्ह्य़ाच्या डहाणू तालुक्यातील घोलवड, बोर्डी, वाणगाव, डहाणू हा बागायती पट्टा चिकूसाठी प्रसिद्ध आहे. येथील गोड आणि रसाळ चिकूला देशभरातून मागणी असते. येथे चिकूफळाचे पीक मुबलक होत असल्याने चिकू अवघ्या ४ ते ५ रुपये किलो दराने मिळत असतो. परंतु या वर्षांच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीने चिकूच्या पिकाचे उत्पादन घटले होते. त्यातच मुंबईसह, गुजरात, दिल्ली, राजस्थान या राज्यांतून येथील चिकूचीे मागणी वाढलीे. त्यामुळे चिकूचे भाव वाढले. हाच पाच रुपये किलो दराने मिळणारा चिकू तीस रुपये किलोवर गेला. इतर राज्यांतील वाढती मागणी चिकू उत्पादकांच्या पथ्यावर पडली आहे. चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी आनंदित झाले आहेत. याबाबत बोलताना एका शेतकऱ्याने सांगितले की, वर्षांच्या सुरुवातीेला झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणीे साचून पिकांना बुरशीे रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे चिकूचीे फळे काळी पडून गळाली होतीे. परंतु हवामान बदलामुळे पुन्हा चिकूची झाडे बहरली आणि बऱ्यापैकी पीक आले. अर्थात हे पीक तुलनेने कमी होते. त्यातच मागणी वाढल्याने चिकू महागल्याचे त्यांनी सांगितले. निर्यातीवर भर ’डहाणू आणि तलासरी तालुक्यांत दहा हजार हेक्टर तर पालघर तालुक्यात सात हजार हेक्टर जागेत चिकूचे उत्पादन घेतले जाते. ’येथील शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय चिकूचे उत्पादन असून आदिवासींनाही जोडधंदा मिळाला आहे. ’लवकरच चिकूचा मोसम सुरू होणार असून तीनशे टन चिकूचीे निर्यात होण्याचीे शक्यता आहे.