लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : डोंबिवलीत मागील ३५ वर्ष वैद्यकीय व्यवसाय करणारे ज्येष्ठ डॉक्टर प्रमोद बेजकर यांनी पहलगाम बेसरन पठारावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा काव्यातून निषेध व्यक्त केला आहे. वैद्यकीय व्यवसायात असले तरी डॉक्टर बेजकर हे कवी मनाचे आहेत. अनेक विषयांवर त्यांनी कविता लिहिल्या आहेत.

दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तीन निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर डॉ. बेजकर यांनी दहशतवादी कृत्य, त्यामुळे होत असलेले जीवित, वित्तीय नुकसान आणि काश्मीर सारख्या नंदनवनात होत असलेले सततचे दहशतवादी हल्ल्याचे प्रकार यामुळे ‘नंदनवनाचे स्मशान न होओ’ अशी भावना डॉक्टर प्रमोद बेजकर यांनी आपल्या काव्यातून व्यक्त केली आहे. कवी जगतासह विविध स्तरांमधुन या कवितेची वाहव्वा होत आहे.

डॉ. बेजकर यांनी लिहिलेल्या ‘शरीराचे विलक्षण विज्ञान’ या पुस्तकाला अलीकडेच महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य व साहित्य संस्कृती मंडळाच्या दिवंगत यशवंतराव चव्हाण राज्य वाडमय पुरस्कार मिळाला आहे. कविता, गाणी, गझल, शेरोशायरी, भावगीत, हजल अशा विविध ढंगांमध्ये ते वैद्यकीय व्यवसाय सांभाळुन लिखाण करतात. ‘लोकसत्ता’च्या लोकरंग पुरवणीतील बालरंग, हास्यरंगमध्ये त्यांनी नियमित लिखाण केले आहे. ‘कॉलेज के दिन’ आणि ‘व्हॅलेटाईंन डे’ हे त्यांचे अल्बम प्रसिध्द झाले आहेत.

अलीकडेच डॉक्टर प्रमोद बेजकर इंग्लंड येथे आपल्या नातेवाईकांकडे कुटुंबीयांसह गेले आहेत. भारतात जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे बेसरन पठरांवर (मिनी स्वीत्झर्लंड) दहशतवाद्यांनी क्रूर हल्ला केला आहे. इतर पर्यटकांसह त्यात डोंबिवलीतील तीन निष्पाप पर्यटक नागरिक मारले गेल्याचे समजल्यावर डॉक्टरांनी तीव्र सहवेदना व्यक्त केल्या. या क्रूर घटनेच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांमधील कवी मन जागृत झाले. त्यांनी बसल्या जागीच हातातील कागदावर क्रूर हल्ल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांचे काव्यमय कथन केले.

काव्यमय कथन

डॉक्टर प्रमोद बेजकर आपल्या ‘नंदनवन ना स्मशान न होवो’ या काव्यात म्हणतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ इतिहासाच्या पानी डाग नवे रक्ताचे
तोंड सारखे काळे होते माणुसकीचे
काय करावे बेलगाम या धार्मिकतेचे
विनाशकले विपरित बुध्दीचे
कुणास ठाऊक धर्म कोठला माणुसकीचा
की उत्क्रांतच झालो नाही अजून आपण
शत्रू शत्रू म्हणत भुई थोपटत वेडे
द्वेषाच्या वडवानलास शोधतात सरपण
कवितेने ना दरी जरी कुठलीच सांधते
शब्दांच्या डोळ्यामधून पण दुख पाझरे
म्लान जरी जग आज..उद्या होईल हासरे
जखमांचे व्रण विसरतील ना बळींची घरे
तलवारीला गंज चढो सगळ्यांच्या आता
बाँम्ब निकामी होवो विद्वेषाचा आता
विनाकारण बळी न जावो असे कुणीही
नंदनवन ना स्मशान होवो असे कधीही.