डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील उर्सेकर वाडीत रात्रीच्या वेळेत व्यवसाय करून झाल्यानंतर फेरीवाले, भाजी विक्रेते टाकाऊ सामान, नाशिवंत भाजीपाला रस्त्यावर फेकून देत असल्याने पालिका सफाई कामगारांची डोकेदुखी वाढली आहे. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील बहुतांशी रस्त्यावर सकाळच्या वेळेत फेरीवाल्यांनी फेकून दिलेल्या कचऱ्याचे ढीग दिसत असल्याने प्रवाशांना मार्ग बदलून रेल्वे स्थानकाकडे जावे लागते. अनेक भाजीविक्रेते, फेरीवाले रात्री उशिरापर्यंत डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात व्यवसाय करतात. वस्तूंना असलेला पुठ्ठा, थर्माकोल, दोऱ्या , चिंध्या असा टाकाऊ कचरा फेरीवाले रस्त्याच्या कोपर्याला फेकून देतात. या कचऱ्यामध्ये वडापाव, भजी, समोसा खाल्लेले कागद तसेच पावाचे तुकडे फेकून दिले जातात. भटकी कुत्री सकाळच्या वेळेत हा कचरा वाकरून रस्त्यावर आणतात . मागील काही दिवसांपासून रेल्वेस्थानक भागात हा प्रकार सुरू आहे. डोंबिवली रेल्वे स्थानक भागात स्कायवॉक वरील जिन्यावर जाण्यासाठी प्रवाशांना कचऱ्यामुळे वळसा घेऊन जावे लागते. यामध्ये अनावश्यक वेळ जातो. अशा नोकरदारांच्या तक्रारी आहेत. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील उर्सेकर वाडी हा अरुंद रस्त्याचा भाग आहे. या रस्त्यावर पालिकेची भाजीमंडई आहे. या मंडई मधील नाशिवंत कचरा रस्त्याच्या कोपऱ्यावर टाकला जातो, अशा पादचाऱ्यांच्या तक्रारी आहेत. हा कचरा वेळेवर उचलला नाही तर भटकी कुत्री तो रस्त्यावर पसरवतात. असे रहिवाशांनी सांगितले. दिवसभरामध्ये स्वच्छ असलेले डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील रस्ते रात्री 11 ते पहाटे चार वाजेपर्यंत कचऱ्यानी भरलेले असतात. रस्त्यावर कचरा फेकणार्या फेरीवाले, दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. " डोंबिवली पूर्व भागातील रस्ते रात्रीच्या वेळेत फेरीवाले, विक्रेत्यांकडून खराब केले जात असतील तर त्यांच्यावर नजर ठेवून दंड आणि कायदेशीर कारवाई केली जाईल", अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिका घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिली.