डोंबिवलीतील पांडुरंगवाडी येथेही रात्र निवारा केंद्राच्या इमारतीत गेले महिनाभर वीजपुरवठा खंडित असून येथील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
पांडुरंगवाडीत चार मजली रात्र निवारा केंद्राची उभारणी २०११ मध्ये करण्यात आली. रेल्वे स्थानक परिसरापासून लांब असल्याने अनेकांना शहरात निवारा केंद्र आहे, याची माहितीच नाही. पालिकेच्या वतीनेही त्याची पुरेशी जाहिरात न झाल्याने या सुविधेपासून बेघर वंचितच आहेत.
दीड वर्षांपूर्वी पालिकेने हे केंद्र गुरुकृपा विकास संघाला नाममात्र एक रुपया भाडय़ाने तीन वर्षांच्या कराराने चालविण्यासाठी दिले. मात्र कंत्राटदारही नागरिकांकडून भाडे वसूल करत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. यावर कंत्राटदार जगदीश पवार यांनी निवारा केंद्र मोफत असले तरी वीज बिल आम्हाला भरावे लागते. महिन्याला पाच ते सहा हजार वीज बिल येत असल्याने एका खोलीमागे ४० ते ५० रुपये भाडे आम्ही आकारतो, अशी माहिती दिली. काही नागरिकांकडून ते हे भाडे वसूल करत असून ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वाखाली संस्था हे केंद्र चालवत असल्याचा त्यांचा दावा आहे.