डोंबिवली – कल्याण डोंबिवली पालिकेत लोकप्रतिनिधी राजवट सुरू होताच, पालिका प्रशासन अधिक आक्रमक आणि गतिमान झाले आहे. मागील दोन दिवसात डोंबिवली पूर्वेत पालिकेच्या फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकुर यांनी मानपाडा रोड भागात रस्त्याच्या दुतर्फा पदपथ, रस्ते अडवून उभारलेल्या टपऱ्या, लावलेल्या हातगाड्या, निवारे तोडकाम पथकाच्या साहाय्याने जमीनदोस्त केले. या आक्रमक कारवाईमुळे फेरीवाल्यांची दाणादाण उडाली. तर टपरी, हातगाडी मालकांची भंबेरी उडाली.

पालिकेच्या फ प्रभाग हद्दीत मानपाडा रस्त्यावरील चार रस्ता, आयकाॅन रुग्णालय परिसर, ठाकुर्ली, चोळे, टिळकनगर, पाथर्ली चौक, शेलार नाका परिसरात काही स्थानिकांनी पदपथ, रस्ते अडवून टपऱ्या, हातगाड्या लावल्या आहेत. काही ठिकाणी पदपथावर निवारे उभारे उभारून व्यवसाय सुरू केल्या असल्याच्या वाढत्या तक्रारी फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकुर यांच्याकडे आल्या होत्या. या तक्रारींची प्रत्यक्ष पडताळणी केल्यावर साहाय्यक आयुक्त ठाकुर यांना फेरीवाले कारवाई करूनही पुन्हा पदपथ, रस्ते अडवून टपऱ्या, हातगाड्या लावून व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले.

दोन दिवसांपासून साहाय्यक आयुक्त ठाकुर यांनी फेरीवाला हटाव पथकाच्या साहाय्याने मानपाडा रस्ता परिसर, टिळकनगर, शेलार नाका, पाथर्ली, टिळक पुतळा, ठाकुर्ली, चोळे, ९० फुटी रस्ता भागातील फेरीवाले हटविण्याची मोहीम सुरू केली आहे. या कारवाईत फेरीवाल्यांचे सामान जप्त करण्यात येत आहे. लाकडी हातगाड्या जागीच घणाच्या घावांनी, जेसीबीने तोडून टाकल्या जात आहेत. लोखंडी टपऱ्या जप्त करून त्या पालिका आवारात आणून ठेवल्या जात आहेत. या आक्रमक कारवाईमुळे फेरीवाले, हातगाडी, टपरी चालकांची भंबेरी उडत आहे.

काही जण राजकीय मंडळींची नावे सांगून आपल्यावरील कारवाई थोपविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला न जुमानता तोडकाम पथक ही कारवाई करत आहे. आयुक्त अभिनव गोयल यांनी शहरातील रस्ते, पदपथ नागरिकांना चालायला मोकळे पाहिजेत. पदपथ, रस्ते अडवून एकही फेरीवाला दिसता कामा नयेत असे आदेश प्रभाग साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून फ प्रभागात फेरीवाल्यांविरूध्द जोरदार कारवाई सुरू आहे.

या कारवाईमुळे रस्ते, पदपथ फेरीवाल, टपरी, हातगाडी मुक्त झाल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

फ प्रभागात रेल्वे स्थानक भागात नियमित कारवाई केली जाते. याशिवाय प्रभागाच्या उर्वरित भागात आता विभागवार फेरीवाल्यांच्या विरूध्द कारवाई सुरू केली आहे. सतत तंबी देऊनही जे फेरीवाले तोडकाम पथकाची पाठ फिरताच पदपथ, रस्ते अडवून व्यवसाय करणार असतील त्यांच्या विरूध्द फौजदारी कारवाई केली जाणार आहे. – प्रसाद ठाकुर साहाय्यक आयुक्त, फ प्रभाग. डोंबिवली.