डोंबिवली शहराला पाणी करणाऱ्या कल्याण जवळील कचोरे येथील नेतीवली टेकडीवरील १५० दशलक्ष लीटर जलशुध्दीकरण केंद्रात आवश्यक तातडीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामासाठी डोंबिवली पूर्व, पश्चिम शहराचा पाणी पुरवठा मंगळवारी सकाळी आठ ते रात्री आठ वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण वाघमारे यांनी दिली. मंगळवारी दिवसभर पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रहिवाशांनी एक दिवस पुरेल इतका वाढीव पाणी साठा करून ठेवावा, असे आवाहन वाघमारे यांनी केले. यापूर्वी डोंबिवली शहराला बारावे येथील जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा केला जात होता. डोंबिवली शहराची वाढती वस्ती, नागरीकरणाचा विचार करून आठ वर्षापूर्वी नेतीवली येथील टेकडीवर पालिकेने डोंबिवलीसाठी स्वतंत्र जलशुध्दीकरण केंद्र उभारले. या केंद्रातून डोंबिवली शहराला पाणी पुरवठा केला जातो. या केंद्रात तातडीने दुरुस्तीचे काम निघाल्याने मंगळवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.