ठाणे – गळती थांबवायची कशी असा प्रश्न आता ठाकरे गटाला पडला आहे. मैदानात उतरल्यावर मागे कोणी राहील की नाही, हे सांगता येत नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर टोला लगावला. ज्या पक्षाला संपलेला समजले होते, त्याच्याकडे आता युतीसाठी प्रस्ताव पाठवला जात आहे, असे म्हणत शिंदे यांनी ठाकरे गट आणि मनसेसोबतच्या युतीवर प्रश्न उपस्थित केला.
नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी रविवारी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी नाशिक महानगरपालिकेतील सात नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशा दरम्याम विलास शिंदे यांना उद्देशून तिकडे काही शिल्ल्क ठेवले का, हा ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है, असा टोला ठाकरे गटाला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.
विलास शिंदे यांच्यासह नाशिकमधील माजी नगरसेवक संतोष गायकवाड, नयना गांगुर्डे, विष्णुपंत बेंडकुळे, प्रवीण पाळदे, पल्लवी पाटील, निलेश ठाकरे, उषा शेळके यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उबाठाचे उप महानगरप्रमुख निवृत्ती इंगोले, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ फडोळ, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष मोहनीश दोंदे, उबाठा युवासेना तालुका अध्यक्ष सुनील मते, त्र्यंबकेश्वरचे सभापती खंडू भोये यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केल्याने नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा नक्की फडकेल, अशी खात्री वाटत असल्याचे मत यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.