नौपाडा परिसरात विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण; दररोज दोन ते तीन वेळा वीजपुरवठा खंडित; व्यापारी वर्गासह परिसरातील कंपन्यांनाही फटका ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ‘ऑक्टोबर हिट’च्या उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत असतानाच ठाणे शहराच्या मध्यवर्ती भाग असलेल्या नौपाडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून दिवसातून दोन ते तीन वेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. या अघोषित भारनियमनामुळे नागरिक हैराण झाले आहेत. करोना टाळेबंदी शिथिलीकरणानंतर नौपाडा, गोखले रोड, राम मारुती रोड परिसरातील अर्थचक्र रुळावर येत आहेत. मात्र, या भागांचा वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्याचा फटका व्यापारी वर्गाला बसत आहे. नौपाडा परिसर हा जुने ठाणे म्हणून ओळखला जातो. येथे मोठ्या प्रमाणात दुकाने, कंपन्यांची मुख्यालये आहेत. तसेच या ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे या परिसरात नागरिकांची मोठी वर्दळ असते. नौपाडा, गोखले रोड, राम मारुती रोड भागात जुन्या वस्त्याही आहेत. या वस्त्यांमध्ये सुमारे १२ ते १५ हजार रहिवासी राहतात. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. दररोज सकाळ किंवा सायंकाळी याठिकाणी सुमारे अर्धा तास वीजपुरवठा खंडित होत आहे. अॉक्टोबर महिन्यातील उकाड्यामुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. त्यातच वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्याचा त्रास नागरिक सहन करत आहेत. नौपाडा परिसरात काही कंपन्याही आहेत. या कंपन्यांमध्येही वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने कर्मचाऱ्यावर कामात व्यत्यय येत आहे. विजेच्या लंपडावामुळे संगणकातील महत्त्वाच्या नोंदी गायब होत आहेत, तर वीजपुरवठा खंडित होत असल्याने दुकानात अंधार पसरत असून यामुळे ग्राहकांना वस्तू दाखविताना दुकानदारांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. नौपाडा भागात राहणारे अनेकजण करोनाच्या प्रादुर्भावामुळे घरूनच काम करतात. त्यांचीही कामे ठप्प पडत आहेत. नौपाडा भागातील वीजपुरवठ्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला तरीही आमचे कर्मचारी अर्ध्या तासाच्या आत तो पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत असतात. - नितीन तिठे, कार्यकारी अभियंता, महावितरण. महावितरणने वीज देयकांची वसुली थांबवून आधी ग्राहकांना चांगली सेवा द्यावी. अशाच प्रकारे विजेचा लपंडाव होत असल्यास आम्हाला पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल. - संजय केळकर, भाजप आमदार, ठाणे शहर हा महिना सणसुदीच्या दिवसांचा आहे. त्यामुळे ठाण्यातील विविध भागांतून नागरिक खरेदीसाठी नौपाडा भागात येतात. मात्र नौपाड्यात गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांचा हिरमोड होतो. त्यामुळे व्यापाऱ्यानाही त्याचा परिणाम सोसावा लागतो. - मितेश शहा, अध्यक्ष, नौपाडा व्यापारी मंडळ. नौपाडा भागात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास वृद्ध तसेच महिलांना त्याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. महावितरणने त्यांच्या ग्राहकांना चांगली सुविधा देणे अपेक्षित आहे. - हेमकांत भालिवडे, रहिवासी, ठाणे.