कल्याण : कल्याण डोंबिवली शहरातील १० प्रभाग हद्दीतील ४५० बेकायदा इमारती, चाळींना घेतलेल्या चोरीच्या नळ जोडण्या पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत तोडून टाकल्या. बेकायदा इमारतींना पाणी, वीज पुरवठा आणि या इमारतींचे घर खरेदी विक्रीचे नोंदणीकरण करू नये, असे आदेश प्रशासनाने महावितरण, उपनिबंधक विभागाला दिले आहेत. पाणी पुरवठय़ाची जबाबदारी पालिकेची असल्याने प्रशासनाने अशा इमारतींना घेतलेल्या चोरीच्या नळ जोडण्या तोडण्याची मोहीम सुरू केली आहे. बेकायदा इमारतींवर सतत कारवाई करुनही भूमाफिया बांधकामे थांबवत नसल्याने पालिकेने अशा इमारतींना वीज, पाणी पुरवठा मिळाला नाही तर माफिया बांधकामे उभारणीचे थांबवतील असा विचार आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केला. बेकायदा इमारतींमधील घर खरेदी विक्रीचे व्यवहार नोंदणीकृत करताना उपनिबंधक विभागाने यापुढे पालिकेच्या नगररचना विभागाला विचारणा करायची आहे. अशी तिन्ही ठिकाणी पालिकेने भूमाफियांची कोंडी केली आहे. अनेक भूमाफिया प्लम्बरना हाताशी धरून बेकायदा इमारतींना पालिकेच्या मुख्य जलवाहिनींवरून चोरून नळ जोडण्या घेतात. अशा नळ जोडण्या शोधून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश पाणी पुरवठा विभागाचे कल्याण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे आणि डोंबिवलीचे कार्यकारी अभियंता किरण वाघमारे यांनी पाणी पुरवठा विभागातील नळ तोडणी कर्मचाऱ्यांना दिले आहेत. डोंबिवलीतील ह, फ, ग आणि ई प्रभाग हद्दीत बेकायदा इमारतींच्या ३६३ नळ जोडण्या कारवाई पथकाने तोडून टाकल्या. कल्याणमध्ये विविध भागांत ८० हून अधिक बेकायदा नळ जोडण्या तोडण्यात आल्या आहेत. या इमारतीच्या विकासकांनी पुन्हा चोरून नळ जोडण्या घेतल्या तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत, असे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी सांगितले. चोरुन नळ जोडण्या घेतल्याने परिसरातील वस्तीला कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. त्या भागाला पालिकेला टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो, असे मोरे म्हणाले.बेकायदा इमारती उभारणाऱ्यांनी चोरुन नळ जोडण्या घेतल्याचे निदर्शनास येत आहे. अशा इमारतींचा पाणी पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू आहे. तोडलेल्या नळ जोडण्या पुन्हा विकासकांनी चोरुन जोडून घेतल्या तर त्यांच्या फौजदारी कारवाई केली जाणार आहे. - प्रमोद मोरे, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग, कल्याण-डोंबिवली महापालिका