डोबिवली : या हल्ल्याची आम्ही वाटच पाहत होतो. ठरल्याप्रमाणे बुधवारी पहाटे तीन वाजता आम्हाला भारतीय लष्कराने सिंदूर या विशेष लष्करी मोहिमेतून पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले केल्याची माहिती समजली. आणि खरच आम्ही समाधानी झालो. पहलगाम येथील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेल्या २६ मृत पर्यटकांच्या आत्म्याला आता खऱ्या अर्थाने शांती मिळाली असेल, अशा प्रतिक्रिया डोंबिवलीतील पहलगाम बेसरन पठारवरील हल्ल्यात मरण पावलेल्या पर्यटकांच्या कुटुंबातील अनुष्का मोने, ऋचा मोने आणि हेमंत जोशी यांचे नातेवाईक जयंत भावे यांनी माध्यमांना बुधवारी दिल्या.

पहलगाम हल्ल्यानंतर विश्वास बसणार नाही असे सडेतोड प्रत्यु्त्तर आम्ही आमच्या शत्रूंना देऊ, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. त्याचवेळी भारत सरकार पहलगाम हल्ल्याचा लवकरच बदला घेईल, असा विश्वास आम्हाला होता. या हल्ल्याची आम्ही वाट पाहतच होतो. अखेर ठरल्याप्रमाणे झाले. भारत सरकार आणि लष्कराने कठोर पावले उचलत पाकिस्तानचे दहशतवादी अड्डे उध्दवस्त केले. या कारवाईने आम्ही समाधानी झालो आहोत. मृत पर्यटकांच्या आत्म्याला या हल्ल्याने शांती मिळेल. असे हल्ले करून दहशतवाद कायमचा संपुष्टात आणला पाहिजे. म्हणजे पुन्हा दहशतवाद्यांची अशी क्रूर कृत्ये करण्याची हिम्मत होणार नाही, असे हल्ल्यातील मृत पर्यटक हेमंत जोशी यांचे नातेवाईक जयंत भावे यांनी सांगितले.

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा भारताने अल्पावधीत बदला घेतला. दहशतवाद्यांचे अड्डे भारतीय लष्कराने उध्दवस्त केले. यात दहशतवादी मारले गेले. लष्कराच्या या सिंदूर विशेष मोहिमेबद्दल आम्हाला भारत सरकार आणि भारतीय लष्काराचा अभिमान वाटतो. या कारवाईमुळे आम्ही खूप समाधानी आहोत. गेलेला माणूस परत येत नाही, याबद्दल दुख आहेच. पर्यटकांच्या बलिदानाला अशाप्रकारच्या कारवाईतून खऱ्या अर्थाने श्रध्दांजली देण्यात आली. दहशतवादाचे समूळ उच्चाटन होईपर्यंत अशाप्रकारच्या कारवाया लष्कराने सुरूच ठेवल्या पाहिजेत. दहशतवाद्यांनी केवळ पर्यटकांवर नव्हे तर भारत देशावर हल्ला केला होता. त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखविणे योग्य होते. लष्कराच्या या विशेष मोहिम कारवाईत आता पुन्हा राजकारण करू नये, अशी प्रतिक्रिया अतुल मोने यांच्या पत्नी अनुष्का मोने यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुधवारी पहाटेच्या सुमारास तीन वाजता आम्हाला भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या तळावर मोठी कारवाई केली आहे, असे समजले. हे ऐकून आम्हाला खूप समाधान वाटले. दहशतवाद्यांनी ज्या क्रूरतेने पहलगाम येथे आमच्या कुटुंबींसह इतर पर्यटकांचे बळी घेतले. त्यांना भारतीय लष्कराने योग्यवेळी धडा शिकवला. आम्हाला पूर्ण खात्री आहे. भारत सरकार दहशतवाद्यांच्या नायनाट केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे ऋचा मोने यांनी सांगितले.