कल्याण – दोन वर्षापूर्वी डोंंबिवलीत शिळफाटा रस्त्यावरून दुचाकीवरून जात असताना एक व्यक्तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मोटार वाहन अपघात दावा न्यायाधिकरणासमोर दावा सुरू होता. ठाणे लोक अदालतमध्ये शनिवारी हा दावा समझोत्याने मिटवण्याकरिता सुनावणीसाठी ठेवण्यात आला होता. यावेळी कुटुंबीय, अपघात विमा कंंपनी यांचे म्हणणे ऐकून ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रधान जिल्हा न्यायाधीश एस. बी. अग्रवाल, मोटार अपघात दावे न्यायाधिकरणाचे सदस्य एस. एन. शाह यांनी अपघातग्रस्त व्यक्तिच्या कुटुंबीयांना दोन कोटी दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.
ठाणे जिल्ह्यातील लोक अदालतमधील हा सर्वाधिक रकमेचा भरपाईचा दावा आहे. डोंबिवलीतील दुचाकी अपघातात मरण पावलेले प्रदीप नागतिलक (४४) यांच्या कुटुंबीयांना प्रधान जिल्हा न्यायाधीश एस. बी. अग्रवाल, दावे प्राधिकरणाचे सदस्य एस. एन. शाह, जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी, नागतिलक कुटुंबीय यांचे वकील जी. ए. विनोद, गो डिजिट विमा कंपनीचे वकील ॲड. केशव पुजारी यांच्या उपस्थितीत भरपाईचा धनादेश देण्यात आला. दोन वर्षापासून हा दावा न्यायधिकरणासमोर सुरू होता. यावेळी मृत प्रदीप यांच्या पत्नी, दोन अल्पवयीन मुले, पालक उपस्थित होते.
याप्रकरणाची लोक अदालतमध्ये मांडण्यात आलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२३ मध्ये दीपक नागतिलक आणि त्यांचा मित्र बुलेटवरून शिळफाटा रस्त्यावरून डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाच्या दिशेने रात्री साडे बाराच्या सुमारास जात होते. प्रदीप यांचा मित्र बुलेट वेगाने आणि निष्काळजीपणे चालवित होता. शिळफाटा रस्त्यावर सोनारपाडा येथील पिंपळेश्वर हाॅटेलसमोरून दुचाकीस्वार जात असताना दुचाकी स्वाराचा बुलेटवरील ताबा सुटला. बुलेट रस्त्याच्या कडेला घसरली. दुचाकीवरील प्रदीप आणि त्यांचा मित्र जखमी झाले. प्रदीप अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता.
प्रदीप हे पिरामल इस्टेटमध्ये व्यवस्थापक होते. त्यांनी दुबई, मस्कतमध्ये नोकरी केली होती. अग्निशमन अधिकारी म्हणून त्यांनी काम केले होते. मृत्यू झाला त्यावेळी त्यांना एक लाख ३५ हजार रूपये वेतन होते. या वेतनावर त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह होत होता. प्रदीप यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर आघात झाला होता. या अपघातप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मोटार अपघात न्यायधिकरणासमोर हा दावा प्रदीप नागतिलक कुटुंबीयांकडून भरपाईसाठी दाखल करण्यात आला होता.
दीर्घकाळ चालणाऱ्या खटल्यांपेक्षा लोक अदालतमध्ये तडजोडीने झटपट विषय मार्गी लावता येतात. याचे हा दावा उत्तम उदाहरण आहे. वादी, प्रतिवादी, न्यायालय, कायदेशीर सल्लागार यांनी बजावलेल्या महत्वपूर्ण, सामोपचाराच्या, तडजोडीच्या भूमिकेमुळे दोन वर्ष कालावधीतील हे प्रकरण लोक अदालतच्या व्यासपीठावर मार्गी लागले, असे अधिवक्ता पुजारी यांनी सांगितले.