आशीष धनगर

ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेला वीटभट्टी व्यवसाय यंदा करोनाच्या कचाटय़ात अडकला असून बांधकामे बंद असल्याने विटांची विक्री पूर्णपणे ठप्प झाली आहे. ऐन हंगामात मालाला उठाव नसल्याने वीटभट्टी व्यावसायिकांकडे अक्षरश: लाखो रुपयांचा माल पडून आहे. काम बंद असल्याने या वीटभट्टय़ांवर काम करणाऱ्या ग्रामीण भागातील कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढावली आहे.

भिवंडी, कांबा, वरप, अंबाडी, वज्रेश्वरी, कुडूस, वाडा, विक्रमगड पट्टय़ामध्ये मोठय़ा प्रमाणात वीटभट्टय़ा आहेत. दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला हा व्यवसाय सुरू होतो, तर मे महिनाअखेपर्यंत सुरू राहतो. या विटांना शहरी भागात मोठी मागणी असते. वीटभट्टय़ांवर मोठय़ा प्रमाणात आदिवासी आणि कातकरी समाजाचे कुटुंब विटा बनवण्याची कामे करतात. या एका कुटुंबीयांच्या आठवडय़ाच्या कामानुसार त्यांना ५ ते ६ हजार रुपये पगार मिळतो. महिन्याकाठी वीटभट्टय़ांवर काम करणारे एक कुटुंब १७ ते २० हजार रुपये कमावते. पावसाळ्यापूर्वी म्हणजेच एप्रिल आणि मे महिन्यात विटांना मोठी मागणी असते. त्यामुळे या कालावधीसाठी मार्चपासून विटांची निर्मिती सुरू होते. गेल्या काही वर्षांपासून बांधकाम व्यवसाय ठप्प असल्याने या विटांची मागणी कमी झाली होती. यंदा काही प्रमाणात विटांना मागणी सुरू झाली होती. मात्र ऐन हंगामात करोनामुळे टाळेबंदी लागू झाल्याने व्यवसाय ठप्प झाला आहे, असे वीटभट्टी व्यावसायिक अतुल पाटील सांगतात. वाडय़ातील गालतरे गावात हरेश नारिग्रा यांची वीटभट्टी आहे. एप्रिल आणि मे महिन्यात विटांना चांगली मागणी असल्याने यंदा हजारो विटा तयार केल्या होत्या. मात्र, करोनाच्या टाळेबंदीमुळे सर्व व्यवसायच ठप्प झाला आहे. बांधकामे बंद असल्याने भट्टी बंद केल्याचे त्यांनी सांगितले.

उदरनिर्वाहाचा प्रश्न

रमेश गवा आणि त्यांचे कुटुंब गेल्या सात वर्षांपासून दरवर्षी विविध ठिकाणांच्या वीटभट्टीवर काम करतात. टाळेबंदीमुळे यंदा त्यांच्या कुटुबीयांना लवकर घरी परतावे लागले आहे. हाताशी पैसे शिल्लक राहिलेले नसून रेशनवर मिळणाऱ्या धान्यावर त्यांच्या कुटुंबीयांना अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, पैसे शिल्लक नसल्याने पावसाळ्यात काम मिळाले नाही तर खायचे काय, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे. या विटांच्या मालाची वाहतूक करण्यासाठी व्यावसायिकांचे ट्रक आणि ट्रॅक्टर असतात. विटांची विक्री बंद असल्याने या गाडय़ांवर चालक म्हणून काम करणारे मधू भोईर यांचाही रोजगार बंद आहे. एप्रिल महिन्यात काम बंद होते. त्यामुळे घर चालवण्यासाठी मालकाकडून एक महिन्याचा पगार आगाऊ घेतला आहे. मे महिन्यात अशीच परिस्थिती कायम राहिल्यास कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल, असे मधू भोईर यांचे म्हणणे आहे.