दशावताराचे गाढे अभ्यासक डॉ. तुलसी बेहरे यांचे शनिवारी संध्याकाळी वसई येथील खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. महाराष्ट्रात दशावतारावर संशोधन करणारे पहिले संशोधक असलेल्या डॉ. बेहरे यांनी डॉ. रमेश कुबल यांच्या मार्गदर्शनाखाली दशावतार या लोककला प्रकारावर पीएचडी मिळवली होती. एक गुणी नट, उत्तम दिग्दर्शक आणि अभ्यासू असणारे बेहरे दशावताराचे व्यासंगी होते. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत ते मानद प्राध्यापक होते. राज्यनाटय़ स्पर्धेत अनेक नाटकांचे दिग्दर्शक त्यांनी केले होते. ज्येष्ठ नाटय़ दिग्दíशका विजया मेहता यांच्या सहवासात त्यांनी ‘हें वंदन’ हे नाटक केलं. ‘राजा दशावतारी’, ‘राजा रुखमांगत’, ‘गरुडजन्म’ ही त्यांची गाजलेली नाटके आहेत. त्यांचा ‘झेलम’ काव्यसंग्रहदेखील प्रकाशित झाला आहे. दशावतारात महिला काम करत नाही असं असूनसुद्धा डॉ. बेहरेंनी लोककला अकादमीत महिलांचा दशावतार बसवला होता हे विशेष.