डोंबिवली : पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला हल्ला हा केवळ पर्यटकांवर, त्यांच्या कुटुंबीयांवर झालेला हल्ला नाही, तर हा देशावर झालेला मोठा आघात आहे. या हल्ल्यामुळे सर्व लष्करी यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या भ्याड हल्ल्यामुळे पाकिस्तानचा बदला घेतल्याशिवाय भारत देश, येथील जनता स्वस्थ बसणार नाही, असा इशारा वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी शुक्रवारी येथे दिला.

पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या डोंबिवलीतील संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांच्या शोकाकुल कुटुंबीयांची शुक्रवारी रात्री वनमंत्री गणेश नाईक यांनी त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली आणि कुटुंबीयांचे सांत्वन केले. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना गणेश नाईक यांनी सांगितले, भारतामधील पाकिस्तानी नागरिकांना भारताने त्यांच्या देशात जाण्याचे आदेश दिले आहेत. आणि भारताने पाकिस्तानमधील आपले वरिष्ठ पातळीवरील अधिकारी, नागरिक यांना पुन्हा भारतात बोलावून पाकिस्तानला आपण काय करणार आहोत, याचा सूचक इशारा दिला आहे. हल्ल्यामुळे आपल्या सर्व लष्करी यंत्रणा सतर्क झाल्या आहे. देशातील जनता दहशतवादाविरुध्द एकटवली आहे. त्यामुळे झाल्या हल्ल्याचा बदला भारत देश घेतल्याशिवाय राहणार नाही, असे वनमंत्री नाईक यांनी सांगितले.

झालेला हल्ला हा पर्यटक कुटुंबीयांवर झालाच, पण तो हल्ला देशाच्या आत्म्यावर झाला आहे. देशाचे नेतृत्व या अमानुषपणे वागणाऱ्या लोकांना सजा दिल्याशिवाय राहणार नाही. या सजेवर देशातील जनतेच्या भावना एकवटल्या आहेत. भ्याड हल्ल्यानंतर देशातील विविध स्तरावरील जनता ज्या पध्दतीने एकवटली आहे. हा जनक्षोभ भविष्यात अशा दृष्ट प्रवृत्तींना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे वनमंत्री नाईक यांनी सांगितले. दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून मारले आहे. त्यामुळे याविषयी कोणीही राजकारण करण्याची गरज नाही. देशातील निर्दोष, निष्पाप लोकांची हत्या दहशतवाद्यांनी केली आहे. याविषयावर जनतेने निषेधाच्या भावनेने एकवटले पाहिजे, असे ते म्हणाले.