ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर कळव्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सात माजी नगरसेवकांनी शिवसेना (शिंदे) पक्षात दोन दिवसांपुर्वी पक्ष प्रवेश केला असतानाच, त्यापाठोपाठ आणखी याच भागातील आणखी चार नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा सोडचिठ्ठी देत शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना पुन्हा धक्का दिला असून त्याचबरोबर या नगरसेवकांना पक्षात घेऊ पाहणाऱ्या भाजपलाही पुन्हा शह दिला आहे.

ठाणे महापालिकेतील कळवा- मुंब्रा हा परिसर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व आमदार जितेंद्र आव्हाड हे करतात. राष्ट्रवादीतील फुटीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार पक्षाने नजीब मुल्ला यांना उमेदवारी देऊन आव्हाड यांच्यापुढे आव्हान उभे केले होते. मात्र, या निवडणुकीत मुल्ला यांचा पराभव करत आव्हाड यांनी विजय संपादन केला होता. असे असले तरी आव्हाड यांचे निकटवर्तीय असलेले नगरसेवक भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच, दोन दिवसांपुर्वी आव्हाड यांचे निकटवर्तीय असलेल्या सात नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, माजी नगरसेविका मनाली पाटील, माजी नगरसेवक महेश साळवी, माजी नगरसेविका मनिषा साळवी, माजी नगरसेविका आणि ठाणे महिला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, माजी नगरसेवक सचिन म्हात्रे, माजी विरोधी पक्ष नेत्या प्रमिला केणी आणि युवा नेते मंदार केणी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता.

त्यापाठोपाठ याच भागातील आणखी चार माजी नगरसेवकांनी शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला असून यामध्ये माजी नगरसेवक मनोहर साळवी, मिलिंद साळवी, अर्पणा साळवी आणि आरती गायकवाड यांचा समावेश आहे. शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदिप या निवासस्थानी हा पक्ष प्रवेश झाला. या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने शिंदे यांनी आव्हाड यांना पुन्हा धक्का दिला असून त्याचबरोबर कळव्यात शिवसेनेच्या नगरसेवकांचे संख्याबळ वाढल्याचे चित्र आहे. कळवा परिसरातील नगरसेवकांची एकूण संख्या १६ इतकी आहे. या सर्वच जागा जिंकण्याचा दावा आता शिवसेनेकडून केला जात आहे. या भागातून सर्वाधिक राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडुण येत होते. मात्र, आता ११ माजी नगरसेवकांनी शिंदेच्या सेनेत पक्ष प्रवेश केल्यामुळे याठिकाणी शिवसेनेची ताकद वाढल्याचे चित्र आहे.