कल्याण : ‘काय रे तुम्हाला मराठी बोलता येते की नाही,’ असे एका नेपाळी आणि इतर दोन परप्रांतीय तरूणांना विचारणा करून चार जणांना नेपाळी वडापाव विक्रेत्यासह त्याच्या दोन साथीदारांना चार जणांनी रविवारी रात्री कल्याण पूर्व भागात चक्कीनाका संतोषनगर भागात बेदम मारहाण केली.या मारहाणीत ही तिन्ही वडापाव विक्रेते गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेदम मारहाण झालेल्या विष्णु थापा यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की मी आणि माझे सहकारी कल्याण पूर्वेतील चक्कीनाका संतोषनगर भागात रिध्दी भोजनालय येथे आचारी म्हणून काम करतो.

रविवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान दोन अनोळखी इसम वडापाव खाण्यासाठी रिध्दी भोजनालय येथे आले होते. वडापाव खाऊन झाल्यानंतर ते दुकानातून निघून गेले. थोड्या वेळानंतर यापूर्वी येऊन गेलेले दोन अनोळखी इसम पुन्हा रिध्दी भोजनालयात आले. त्यांनी मला मराठी बोलता येते की नाही असा प्रश्न केला. आणि आपण काही बोलण्याच्या आत आपणास शिवीगाळ करत या दोन जणांनी मारहाण सुरू केली. आपल्या नाकावर ठोशाबुक्क्याने मारहाण झाली. त्यामुळे नाकाला गंभीर दुखापत झाली.

मला मारहाण केल्यानंतर मारहाण करणारे दोन्ही इसम निघून गेले. ते निघून गेले म्हणून आम्ही पुन्हा आमच्या दुकानात कामाला लागलो. त्यानंतर त्या दोन इसमांनी पुन्हा आपल्या जोडीला वाढीव दोन इसम आणले. असे चार जण मिळवून रिध्दी भोजनालयात आले. त्यांनी पुन्हा मराठीचा विषय उपस्थित करून पुन्हा मला मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी आपला एक सहकारी मदन थापा दुकानात काम करत होता. त्याला दुकानातील मिळेल त्या साहित्याने मारहाण करण्यात आली. एकाने फरशीचा तुकडा मदनला मारून दुखापत केली. अन्य सहकारी अली खान याचा मोबाईल फरशीवर आपटून तो फोडून टाकण्यात आला.चारही जणांनी दुकानात उच्छाद मांडला होता. ग्राहकांसाठी विक्रीसाठी तयार करण्यात आलेले भोजन चारही जणांनी इतस्ता फेकून अन्नाची नासधूस केली. दुकानातील भांडी बाहेर फेकून दिली. बराच उशीर हे इसम दुकानात गोंधळ घालत होते.

आम्हाला मारहाण केल्यानंतर हे इसम दुकानातून निघून गेले. याप्रकरणी विष्णु थापाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. हवालदार जाधव तपास करत आहेत. चक्कीनाका संतोषनगर भागात गुंडगिरीचे प्रमाण अधिक आहे. रात्रीच्या वेळेत दुकानदार, फेरीवाल्यांना हप्ता देण्यासाठी नियमित दमदाटी केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. याच भागातील काही गुंड दीड वर्षापूर्वी पोलिसांनी हद्दपार केले आहेत.