अंबरनाथः अंबरनाथच्या पूर्व भागात हुतात्मा चौकाजवळ स्वामी समर्थ चौकाकडून येणाऱ्या मार्गावर रात्री साडे अकराच्या सुमारास एका चारचाकी गाडीने पेट घेतला. सुदैवाने वेळीच चारचाकीतील प्रवाशांनी बाहेर येत स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर अंबरनाथ नगरपालिका आणि एमआयडीसीच्या अग्नीशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवली. या आगीमुळे शेजारी रस्त्य़ावर उभी करण्यात आलेली आणखी एक कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

हेही वाचा : Maharashtra Political Crisis Live Updates : विधिमंडळ कामकाजाच्या महत्त्वाच्या अपडेट एका क्लिकवर

हेही वाचा : कल्याण-डोंबिवलीत चालकांना रस्त्यांवरील भटक्या गुरांच्या बैठकांचा अडथळा

उल्हासनगरातून एक कुटुंब आपल्या कानसईतील घरी परतत असताना स्वामी समर्थ चौक ते हुतात्मा चौक दरम्यान रस्त्यावर अचानक कारच्या मागच्या भागातून धुर येत असल्याचे चालकाला जाणवले. त्यानंतर त्याने रस्त्यातच गाडी थांबवून बाहेर पडत असतानाच इंजिनच्या भागातून आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. कारमधील प्रवासी बाहेर उतरत असताना गाडीने पेट घेतला. क्षणाधार्थ संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. याची माहिती जवळ उपस्थित असलेल्या नागरिकांनी तात्काळ अंबरनाथ नगरपालिकेच्या अग्नीशमन दलाला दिली. तात्काळ अंबरनाथ नगरपालिकेचे अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र कारची आग विझत नव्हती. त्याचवेळी गाडीचा ब्रेक व्यवस्थित न लावल्याने गाडी काही मीटर पुढे सरकून रस्त्यावर उभ्या असलेल्या दुसऱ्या कारला जाऊन ध़डकली. त्यामुळे त्या कारवरही आग पसरली. पाण्याने आग विझत नसल्याने अखेर अंबरनाथच्या आनंदनगर अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनी फेसाळ पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले. काही मिनीटांनंतर अखेर आग विझली. मात्र या घटनेत दोन्ही कार पूर्णपणे जळाल्या आहेत. दोन्ही कारचे नुकसान झाले असले तरी कोणतीही जिवीतहानी झालेली नाही, अशी माहिती अग्नीशमन अधिकारी भागवत सोनोने यांनी दिली आहे.