पहाटे तापमानाचा पारा २१ अंशापर्यंत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : गेल्या आठवड्याभरात परतीचा पाऊस झाल्यानंतर काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात उकाडा जाणवत होता. गेल्या काही दिवसांपासून मात्र सकाळी गारवा तर दुपारी उन्हाचे चटके बसू लागले आहेत. जिल्ह्यातील विविध भागातील पहाटे तसेच  सकाळचा किमान तापमानाचा पारा २१ अंश सेल्सियसवर आला आहे. 

दरवर्षी अॉक्टोबर महिन्यात तापमानात मोठी वाढ झालेली पाहायला मिळते. या कालावधीत नागरिकांना उन्हाचे चटके सोसावे लागतात. यावर्षी अॉक्टोबर महिन्यातील मागील दोन आठवडे राज्यातील विविध भागात परतीचा पाऊस झाला आहे. परतीचा पाऊस झाल्यानंतर काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात पहाटे थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली. जिल्ह्यातील विविध भागातील किमान तापमान २१ अंशापर्यंत खाली उतरले आहे. 

अंबरनाथ, बदलापूर तसेच इतर ग्रामीण भागात पहाटेच्या वेळी धुके पसरलेले पाहायला मिळत आहे. सकाळच्या वेळी वातावरणात गारवा जाणवत असला तरी दुपारच्या वेळी नागरिकांना उकाडा सहन करावा लागत आहे. दुपारी १२ वाजेनंतर तापमान वाढ होत असून कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत असल्याचे चित्र आहे. या वातावरणातील बदलामुळे नागरिकांना आरोग्याच्या बाबतीत समस्या भेडसावू लागल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या वातावरणात होत असलेल्या बदलामुळे साथीच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. दुपारी जाणवत असलेल्या उकाड्यामुळे अनेकजण थंड पेयाचे सेवन करतात. त्यामुळे सध्या सर्दी, खोकला, ताप आणि थकवा या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. – डॉ. नंदकुमार ठाकूर, कोपरी

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Garva in the morning afternoon sun clicks morning temperature mercury akp
First published on: 28-10-2021 at 00:20 IST