पाच गृहसंकुलांतून तब्बल १३० किलो खराब औषधांचे संकलन निखिल अहिरे ठाणे : निरुपयोगी ठरलेली अथवा मुदत संपल्याने खराब झालेली औषधे कचऱ्यात टाकण्याऐवजी त्यांची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याच्या हेतूने ठाण्यातील आर निसर्ग या संस्थेने मुदतबाह्य़, निरुपयोगी, खराब औषधांचे संकलन करण्यास सुरुवात केली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आलेल्या या ‘ग्रीन फार्मसी’ मोहिमेअंतर्गत ठाण्यातील पाच गृहसंकुलांतून १३० किलो औषधे गोळा करण्यात आली. या अंतर्गत संस्थेतर्फे ठाण्यातील एकूण पाच गृहसंकुलांमध्ये निरुपयोगी औषधे संकलित करण्यासाठी कचऱ्याचे डब्बे ठेवण्यात आले आहेत. अन्य पाच ठिकाणीदेखील निरुपयोगी औषधे टाकण्यासाठी डबे ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनीदेखील याला उत्तम प्रतिसाद दिला आहे. यातूने एका महिन्यात १३० किलो निरुपयोगी गोळ्या औषधांचा कचरा गोळा करण्यात आला आहे. या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यासाठी कचरा तळोजा येथील मुंबई कचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये पाठविण्यात आला आहे. यात गोळ्यांच्या आणि इतर औषधांच्या रिकाम्या पाकिटांवर प्रक्रिया करून पुन्हा उपयोगात आणण्याजोगे बनविले जाते, अशी माहिती देण्यात आली. औषधे फेकण्याचे डबे विकास कॉम्प्लेक्स, दोस्ती, पारिजात, तारांगण आणि आनंद कोरस या पाच रहिवासी गृहसंकुलांमध्ये ग्रीन फार्मसी प्रकल्पाअंतर्गत औषधे संकलित करण्यासाठी स्वतंत्र डब्यांची सोय करण्यात आली आहे. या गृहसंकुलांबरोबरच ग्राहक पंचायत कार्यालय, ब्युटी आर्केड, ठाणे हेल्थ केअर, इनरव्हील क्लब, हिरानंदानी रोटरी क्लब या ठिकाणीदेखील औषधे संकलित करण्याची संस्थेतर्फे सोय करण्यात आली आहे. ग्रीन फार्मसी प्रकल्पाला नागरिकांचा अत्यंत उत्तम प्रतिसाद आहे. पुढील सहा महिने सध्या सुरू असलेल्या ठिकाणांवर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी सध्या संस्थेतर्फे पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला जात आहे. - लता घनश्यामनानी, संचालिका, आर निसर्ग संस्था, ठाणे