कल्याण- ‘तुम्ही पोलिसांचे खबरी आहेत. तुम्ही पोलिसांना माहिती देता. त्यामुळे आमच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत,’ असे सांगत कल्याण जवळील एक नोकरदार तरुण आणि त्याच्या साथीदाराला कल्याणधील चार जणांनी बेदम मारहाण केली. या तरुणांवर चाकूने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी सांगितले, कल्याण जवळील वडवली गावातील रवी बाळाराम पाटील (३०) हे नोकरदार आहेत. रवी यांचा मित्र जितेश पाटील यांना कल्याण मधील चार जणांनी उल्हास नदीवरील पुलाजवळ अडविले आणि त्याला शिवीगाळ सुरू केली. ही माहिती जितेशने मित्र रवी यांना दिली. रवी तात्काळ उल्हास खाडी जवळील पुलावर दुचाकीने आला. तेथे चार जण जितेश याच्याशी भांडण करुन त्याला शिवीगाळ करत होते. रवी पाटील यांनी मध्यस्थी करून हा विषय मिटविण्याचा प्रयत्न केला. तो मध्यस्थी करत असताना प्रथमेश सुधीर पाटील, हमेंत पाटील, करण सुधीर पाटील व अन्य एक इसम यांनी ‘तुम्ही दोघे पोलिसांचे खबरी आहेत. तुम्ही पोलिसांना माहिती देता. त्यामुळे आमच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत,’ असे बोलून दोघांना मारहाण केली. प्रथमेशने रवी यांना जोरदार धक्का देऊन खाली पाडले. हातामधील चाकुने रवीवर वार केले. इतर मित्रांनी लोखंडी सळईने रवीला बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेले. खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी रवी पाटील यांनी तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.