कल्याण जवळील आंबिवली वडवली भागात राहणाऱ्या एका ३५ वर्षाच्या अपंग महिलेला न्यायालयात साक्ष देण्यास जाऊ नको असे बोलून चार ते पाच जणांच्या टोळक्याने शुक्रवारी बेदम मारहाण केली. या महिलेवर कल्याण मधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.वैजयंती पाटील असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे. त्या आंबिवली येथील वडवली भागात राहतात.

हेही वाचा >>> वादळी वाऱ्यांमुळे कल्याण मध्ये नवरात्रोत्सवाच्या कमानी कोसळल्या

येत्या १५ ऑक्टोबर रोजी कल्याण न्यायालयातील एका खून प्रकरणात त्या साक्षीदार आहेत. त्यांची साक्ष महत्वाची असल्याने काही व्यक्तिंकडून त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत आहे. अशाच एका टोळक्याने शुक्रवारी त्यांना घराजवळ भेटून न्यायालयात साक्षीसाठी जाऊ नकोस असे बजावून त्यांना शिवीगाळ आणि बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर टोळके पळून गेले. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.