विरार : चारित्र्याच्या संशयावरून नालासोपारा येथे एका महिलेने पतीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नालासोपारा-तुळींज पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. पतीने आत्महत्या केलाचा बनाव रचण्याचा प्रयत्न  तिने केला. मात्र, ही हत्या असल्याचे तपासात समोर आले आहे.

नालासोपारा गालानगर येथे तुलसी अपार्टमेंटमध्ये राहणारा सुनील कदम मुंबईत एका खासगी कंपनीत काम करत होता. तो आई-वडील, पत्नी प्रणाली आणि दोन मुली यांच्यासह राहत होता. सुनीलच्या चारित्र्याच्या संशयातून या दोघांमध्ये नेहमी भांडणे होत.  बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास याच मुद्दय़ावरून दोघांत वाद सुरू झाला. प्रणालीने स्वयंपाकघरातील चाकूने सुनीलवर ११ वार केले. यात सुनीलचा जागीच मृत्यू झाला. तिने रक्ताचे डाग पुसण्याचा प्रयत्न केला. सुनीलने आत्महत्या केल्याचा बनाव तिने रचला होता. मात्र, ही हत्या असल्याचे तपासात स्पष्ट झाले.