ठाणे: लग्न समारंभ आगळावेगळा व्हावा यासाठी यजमान काय करतील याचा काही नेम नाही. कोकण पट्ट्यात ठाणे, रायगड या जिल्ह्यात हळद कार्यक्रमही मोठ्या उत्साहात केला जातो. यापूर्वी प्रसिद्ध कलाकार, नट्या आणून त्यांच्या नाचाचा कार्यक्रम केला जात होता. मात्र आता खिल्लारी बैल हळदीच्या सोहळ्यांमध्ये आणून त्यावर पैशांची लयलूट केली जात असल्याचे दिसून आले आहे. अशाच एका हळदी सोहळ्यात आणलेला बैल उधळला आणि वऱ्हाड्यांची एकच तारांबळ उडाल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. सुरुवातील शांत उभा असलेला हा बैल एकाएकी उधळत कार्यक्रम स्थळी पळत असल्याचे यात दिसून येते आहे. या कार्यक्रमाची सध्या जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.

ठाणे, रायगड जिल्ह्यात हळदीच्या कार्यक्रमात खिल्लार बैल नाचविण्याची नवी प्रथा सुरू झाली आहे. या प्रथेमुळे अपघातांच्या घटना घडू लागल्या आहेत. रविवारी कल्याण शिळं रस्त्यावर पडले गावात एका कुटुंबियांच्या घरी हळदीचा कार्यक्रम होता. पाहुणे मंडळी आणि कुटुंबीय नाचण्यात दंग होते. दरम्यान याच हळदीच्या कार्यक्रमात अचानक काही उत्साही तरुणांनी बैल नाचावण्यासाठी आणला. वाजंत्री आणि रंगमंचाच्या अगदी समोर हा बैल आणून उभा करण्यात आला. त्याच्यासमोर काही व्यक्तींनी पैशांची उधळण देखील सुरू केली. तर लग्नातील अनेक जण या बैलाच्या शेजारी उभे राहून छायाचित्र काढू लागले.

मात्र इतक्यात राग आलेल्या बैलाने जोरदार उडी मारली आणि त्या जागेवरून पळण्याचा प्रयत्न केला. यावेळी नाचणाऱ्यांना तुडवत बैलाने आपली वाट मोकळी केली. या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाआहे. काही मिनिटात हळदीच्या उत्साहावर पाणी फिरल्याचे दिसून येते आहे. सर्व वऱ्हाडी मंडळी यांची पळापळ झाल्याचे दिसते आहे. अनेक महिला वऱ्हाडी जीव वाचवून पळताना दिसत आहेत. अखेर काही मिनिटात काही तरुण या बैलाला नियंत्रणात आणत असल्याचेही दिसते आहे. त्यानंतर वऱ्हाड्यांचा जीव भांड्यात पडल्याचे दिसते आहे.

प्रकारावर टीका

दरम्यान या प्रकाराची चर्चा सध्या सर्वत्र होते आहे. लग्न सोहळ्यासारख्या मंगल कार्यक्रमात बैल वाचवणे ही प्रथा नाही अशी भूमिका समाजातील अनेक जण मांडत आहेत. यामुळे वऱ्हाड्यांचा जीव धोक्यात घालत असल्याची प्रतिक्रियाही अनेक जण देताना दिसत आहे. फक्त समाज माध्यमांवर एखादा रीळ किंवा व्हिडिओ टाकण्यासाठी तरुण हे उद्योग करत असल्याची माहिती तरुणांनी दिली आहे. विशेष म्हणजे शर्यतीला परवानगी मिळाल्यानंतर त्याच बैलांना प्रतिष्ठेसाठी विविध कार्यक्रमात नेले जात असून हे बैल अशा गोंधळात उधळताना दिसतात. यांना शर्यतींसाठी आक्रमक बनवले जाते. त्यामुळेच कार्यक्रमात ते उधळतात असेही म्हटले जाते.