स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने भारतीय स्वातंत्र्याची अस्मिता व अभिमानाचे प्रतिक असलेला राष्ट्रीय ध्वज तिरंगा ठाण्यातील घराघरांमध्ये फडकवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

शहर भाजपाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. ठाणे शहरातील विविध भागात रॅलींबरोबरच मान्यवर व्यक्तींकडे तिरंगा मानाने सुपूर्द केला जात आहे. त्याचबरोबर अमृत महोत्सवानिमित्ताने `हर घर तिरंगा’ अभियानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आकर्षक सेल्फी पॉईंटसह तिरंगा रथ तयार केला आहे. या रथाचे व तिरंगा रॅलीचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा माधवी नाईक, सचिव संदिप लेले, माजी गटनेते संजय वाघुले, मनोहर डुंबरे यांच्यासह माजी नगरसेवक-नगरसेविका, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार अमृत महोत्सवात घरोघरी तिरंगा फडविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तिरंगा हा अस्मिता व अभिमानाचे प्रतिक आहे. देशाचा सैनिक हा तिरंगा फडकविण्यासाठी लढतो. मात्र, हरलो तर तिरंग्यात देह लपेटला जाईल, अशी सैनिकाची भावना असते. त्या राष्ट्रीय ध्वज तिरंगाचा मानसन्मान वाढविण्यासाठी, ठाण्यातील प्रत्येक घरी तिरंगा फडकवावा.