करोना प्रतिबंधात्मक लस न घेतलेल्या नागरिकांचे मृत्यू होत असल्याचे उघड ठाणे : ठाणे जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट होऊ लागल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. करोना रुग्णसंख्येत घट होऊ लागली असली तरी दुसरीकडे मात्र गेल्या काही दिवसांपासून मृत्यूच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. मृतांमध्ये लसीकरण न झालेल्या नागरिकांची संख्या अधिक असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला असून यासाठी जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला आहे. महिन्याभरापासून करोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. ६ ते १२ जानेवारी या कालावधीत आठवडय़ाभरात दररोज सात हजारहून अधिक करोना रुग्ण आढळून येत होते. प्रशासनाकडून दिवसाला २० ते २५ हजार करोना चाचण्या केल्या जात आहेत. त्यापैकी ३० ते ४० टक्के नागरिकांना करोनाची लागण झाल्याचे आढळून येत होते. परंतु यातील बहुतांश रुग्ण हे सौम्य लक्षणे असलेले तसेच गृह विलगीकरणातील होते. गेल्या तीन ते चार दिवसांपासून दैनंदिन करोना संख्येत ६०० ते एक हजार इतकी घट होऊ लागली आहे. जिल्ह्यात सोमवारी ४,५८३ करोना रुग्ण आढळून आले होते. रविवारी ५,६२५, शनिवारी ६,०२९ आणि शुक्रवारी ६,४५९ करोना रुग्ण आढळून आले होते. सर्वाधिक करोना रुग्ण हे ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई क्षेत्रात आढळून येत आहेत. येथील रुग्णसंख्येतही किंचित घट झालेली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला असता, जिल्ह्यात करोना रुग्णसंख्येत घट होऊ लागली आहे. करोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण कमी असल्याने ही लाट सौम्य असल्याचे दिसते. तसेच जिल्ह्यातील नागरिकांचे करोना प्रतिबंधक लसीकरण मोठय़ाप्रमाणात झाले आहे. त्यामुळे रुग्ण लवकर बरे होत असून रुग्णसंख्या घटत असावी, असे त्यांनी सांगितले. दररोज सरासरी आठ मृत्यू डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात दिवसाला एक ते दोन मृत्यू होत होते. काही दिवस तर एकही मृत्यू नव्हता. मात्र आता उलट चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात आता रुग्ण संख्येत घट होऊ लागली असतानाच दुसरीकडे मृत्युसंख्येत वाढ होऊ लागली आहे. ११ जानेवारीपासून दररोज चार ते आठ मृत्यू होत आहेत. या संदर्भात ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, ११ ते १७ जानेवारी या आठवडय़ाभरात जिल्ह्यात ३४ जणांचा मृत्यू झाले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. मृतांमध्ये करोना प्रतिबंधक लस घेतली नसलेल्या नागरिकांचे प्रमाण हे अधिक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ३१ हजार नागरिकांना वर्धक मात्रा १० जानेवारी पासून वर्धक मात्रा देण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे जिल्ह्यात वर्धक मात्रा घेणाऱ्या लाभार्थी नागरिकांची ८१ हजार ७३६ इतकी संख्या असून यामध्ये अत्यावश्यक सेवेत काम करणारे २८ हजार ७७५, आरोग्य सेवेत काम करणारे ४४ हजार ६७३ आणि ६० वर्षांवरील ८,२८८ नागरिकांचा समावेश आहे. यापैकी आतापर्यंत ३१ हजार ४०८ नागरिकांनी वर्धक मात्रा घेतली असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. स्वतंत्र केंद्रांची उभारणी जिल्ह्यातील काही भागात वर्धक मात्रा घेणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र केंद्रे उभारण्यात आली असून त्याचबरोबर विशेष लसीकरण सत्र आयोजित करण्यात येत आहेत. ठाणे शहरात सध्या दररोज नऊशे ते एक हजाराच्या आसपास नागरिक वर्धक मात्रा घेत आहेत. तर, ठाणे ग्रामीण भागातही दररोज १०० ते २०० नागरिक वर्धक मात्रा घेत आहे. जिल्ह्यात वर्धक मात्रा घेतलेल्या ३१ हजार ४०८ नागरिकांमध्ये आरोग्य सेवेत काम करणारे ११ हजार २१६, अत्यावश्यक सेवेत काम करणारे ११ हजार २४८ आणि ६० वर्षांवरील ८,९४४ नागरिकांचा समावेश आहे. ठाणे शहरात वर्धकमात्रेचे लसीकरण हे मोठय़ासंख्येने होत असल्याचे दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत वर्धक मात्रा घेतलेल्या ३१ हजार ४०८ नागरिकांमध्ये ठाणे शहरातील ९,९५५, भिवंडीतील ८०५, उल्हासनगर ६५८, अंबरनाथ ४२३, बदलापूर ५८१ आणि ठाणे ग्रामीणमधील १,२०६ नागरिकांचा समावेश असून उर्वरित १७ हजार ७८० हे कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि मिरा- भाईंदर शहरातील आहेत.