कल्याण मध्ये गेल्या आठवड्यापासून दुचाकी, चारचाकी वाहने रात्रीच्या वेळेत चोरीच्या घटना वाढल्या आहेत. सोमवारी रात्री कल्याण पश्चिमेतील दोन वेगळ्या ठिकाणच्या दुचाकी, चारचाकी वाहने चोरट्यांनी चोरुन नेली आहेत.चोरट्यांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही असे प्रश्न संतप्त नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. अलीकडे बहुतांशी पोलीस अधिकारी एका लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या खास साहाय्यकांकडून देण्यात आलेल्या खास कामांमध्ये व्यस्त असल्याने गुन्हे सारख्या घटनांकडे पोलिसांचे लक्ष नसल्याची चर्चा शहरात वरिष्ठ वर्तुळात सुरू आहे. हेही वाचा >>>डोंबिवलीत गरीबाचापाडा, भोईर जीमखाना परिसरातील रस्त्यांची दुरवस्था, बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट कल्याण पश्चिमेतील वायलेनगर भागात राहणारे नथुसिंग गोदारा यांची चारचाकी मोटार वायलेनगर येथील जायका हाॅटेल रस्त्यावर उभी करुन ठेवण्यात आली होती. सोमवारी रात्रीच्या वेळेत चोरट्याने बनावट चावीच्या साहाय्याने डिझायर मोटारीचे दरवाजे उघडून वाहनात प्रवेश करुन मोटार चोरुन नेली आहे. साडे तीन लाख रुपये किमतीची ही मोटार आहे. नथुसिंग यांनी याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.शहाड येथे राहणारे जयंतीलाल पटेल यांची दुचाकी त्यांनी आशापुरा कार्पोरेशन लाकडाच्या वखारी जवळ उभी करुन ठेवली होती. चोरट्याने रात्रीच्या वेळेत या दुचाकीची चोरी केली आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.