किशोर कोकणे ठाणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इंधन दरवाढीची झळ मालवाहतूकदारांना बसू लागल्याने काही अवजड मालवाहतूकदार संघटनांनी व्यापारी, कंपन्यांकडे मालवाहतुकीच्या दरात २५ टक्क्यांची वाढ करावी अशी मागणी लावून धरली आहे. इंधनाचे दर वाढत असताना आहे त्या दरांमध्ये वाहतूक करणे शक्य नसल्याची भूमिका या संघटनांनी मांडली असून अजूनही कंपन्या तसेच व्यापाऱ्यांनी या दरवाढीला परवानगी दिलेली नाही. गेल्या काही महिन्यांपासून इंधनाची दरवाढ होत आहे. गेल्या आठवडय़ापासून ही दरवाढ सलग होताना दिसून आली आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी हे गोदामाचे शहर आहे. त्यामुळे दररोज हजारो अवजड वाहने भिवंडी येथून गुजरात किंवा उरण जेएनपीटीच्या दिशेने वाहतूक करत असतात. उरण जेएनपीटी ते गुजरातच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मध्यम आकाराच्या कंटेनरसाठी पूर्वी इंधन खर्च आणि टोल खर्च मिळून वाहतूकदारांना दररोज फेरीसाठी १५ ते १६ हजार मोजावे लागत होते. त्या मालवाहतूकदारांना आता फेरीला १८ हजार रुपयांच्या घरात पैसे मोजावे लागत असल्याचे मालवाहतूकदारांनी सांगितले. याचा परिणाम थेट मालवाहतूकदारांना बसू लागला आहे.