ठाणे : वृक्ष पडून होणारी जिवितहानी तसेच वित्तहानी टाळता यावी यासाठी जर्मनीतील आधुनिक एमआरआय आधारीत यंत्राद्वारे वृक्षांची तपासणी (ट्री ऑडिट) करण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला होता. यासंबंधीचा प्रस्तावही प्रशासनाने तयार केला होता. मात्र, निधी उपलब्ध नसल्यामुळे हा प्रस्ताव कागदावरच राहीला. यामुळे शहरातील वृक्ष तपासणी रखडली असल्याची बाब उघडकीस आली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात पावसाळ्यात वृक्ष उन्मळून पडल्याचे प्रकार घडतात. अशा घटनांमध्ये काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. असे प्रकार टाळण्यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रमुख रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, रुग्णालये, उद्याने, चौक, बस स्टॉप आणि रहिवासी परिसरातील धोकादायक फांद्याची छाटणी करण्यात येत आहे. असे असले तरी बुधवारी अवकाळी पावसादरम्यान आणखी एक अपघात घडला. ठाण्यातील राबोडी भागात गुलमोहरचे झाड रिक्षावर कोसळले. यात तौफिक सौदागर (२७) या प्रवाशाचा मृत्यु झाला तर, रिक्षा चालक शफीक शब्बीर (५०) हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेच्या निमित्ताने शहरातील धोकादायक वृक्षांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

वृक्ष पडून जिवीतहानी होऊ नये यासाठी वृक्षांची तपासणी करण्याची मागणी सातत्याने होत असतानाही त्याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याची बाब उघडकीस आली आहे. वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य विक्रांत तावडे यांनी अशा प्रकारची मागणी पाच वर्षांपुर्वी केली होती आणि गेल्यावर्षी आयुक्तांची भेट घेऊन जर्मनीतील आधुनिक एमआरआय आधारीत यंत्राद्वारे वृक्षांची तपासणी (ट्री ऑडिट) करण्याबाबत माहिती दिली होती. मात्र, निधी उपलब्ध नसल्यामुळे हा प्रस्ताव कागदावरच राहील्याची बाब समोर आली आहे.

जर्मनीतील आधुनिक एमआरआय आधारीत यंत्राद्वारे वृक्षांचे वय, आरोग्य, पोकळपणा, कीड लागलेली अवस्था, वाळवीचा प्रादुर्भाव आणि धोका ओळखता येतो. यामुळे वृक्षाच्या सदृढतेचा अंदाज येतो आणि वृक्ष दुर्घटनाग्रस्त होण्यापुर्वी सशक्त करण्याबाबत किंवा काढण्याबाबत निर्णय घेण्यात येतो. यामुळे जिवित व वित्तहानी टाळता येते. याबाबत आयुक्तांना माहिती दिल्यानंतर त्यांनी याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर वृक्ष प्राधिकरण विभागाने यासंबंधीचा प्रस्ताव तयार करून लेखा व वित्त विभागाकडे पाठविला.

परंतु मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत अधिकार नसतानाही त्यास लाल कंदिल दाखविला. त्यामुळे वृक्ष तपासणी रखडली आहे. यामुळेच वृक्ष पडून प्रवाशाचा मृत्यु झाल्याप्रकरणी वित्त अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य विक्रांत तावडे यांनी केली. वृक्षांची पाणी करण्याची मागणी करूनही ती का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित करत धोकादायक वृक्षांच्या तक्रारी करूनही त्याकडे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य नम्रता भोसले यांनी केला.