कल्याण – एक हजार १११ वर्षांनी होळी तोच वार, त्याच तारखेला आल्याचा योग प्रथमच जुळून आला आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील जांबगाव येथील ताम्रपटातून होळीच्या या योगाचा उलगडा झाला आहे. राष्ट्रकुट वंशातील राजा इंद्र तृतीय याच्या कार्यकाळात हा ताम्रपट तयार करण्यात आला होता. संस्कृत, देवनागरी लिपीतील हा ताम्रपट आहे.

या ताम्रपटातील माहितीप्रमाणे एक हजार १११ वर्षापूर्वी होळी फाल्गुन शुध्द सात, बुधवार, मार्गशीर्ष, युव सवंत्सर, शक सवंत् ८३६ (गत वर्ष), बुधवार, २४ फेब्रुवारी इसवी सन ९१५ रोजी आली होती. हा कालावधी पाहिला तर २४ फेब्रुवारी इसवी सन ९१५ ते आता साजरी होणारी २ आणि ३ मार्च २०२६ चा कालावधी पाहिला तर हा सात दिवसांचा कालावधी मागील तिथी पाहिल्या तर मिळत्या जुळ्यात आहेत. त्यामुळे आता साजरी होणारी होळी ही एक हजार १११ वर्षानंतर प्रथमच तोच वार आणि त्याच तारखेला आली आहे. कल्याणमधील कल्याणच्या इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक डाॅ. श्रीनिवास साठे यांच्या पुस्तक संग्रहालयात उपलब्ध असलेल्या इतिहासकालीन ग्रंथांमधून ही माहिती उपलब्ध झाली आहे.

योग आला जुळून

एक हजार १११ वर्षापूर्वी होळी फाल्गुन शुध्द सात, बुधवार, मार्गशीर्ष, युव सवंत्सरात आली होती. मागील तिथी आणि वार ताडून पाहिले तर आता साजरी होणारी होळी तब्बल एक हजार १११ वर्षांनी तोच वार, त्याच तारखेला आली आहे हे स्पष्ट होते. या कालावधीत पाच दिवसांचे अंतर दिसत असले तरी तिथी, वार तपासले तर एक हजार १११ वर्षाचा काळ मिळता जुळता आहे, असे इतिहासाचे अभ्यासक डाॅ. श्रीनिवास साठे यांनी सांगितले. अशा मिळत्या जुळत्या योगांची इतिहासाचे नवोदित अभ्यासक, नागरिकांनाही माहिती असावी. यामधून नवनवीन माहिती उलगडत जाते. इतिहासाचे नवीन कंगोरे उलगडत जातात, असे डाॅ. साठे यांनी सांगितले.

ताम्रपट सारांश

औरंगाबाद जिल्ह्यातील जांबगावचा ताम्रपट हा राष्ट्रकुट वंशातील राजा तृतीय याच्या कारकिर्दीतील आहे. मान्यखेटमा राजधानीहून कुरुंदक गावी राजा गेला असताना आपल्या पट्टबंधोत्सवाच्या वेळी तुलापुरूष याहादानानिमित्ताने राजाने हे दान दिले आहे. राजाने पैठणजवळ असलेले खईरोंढी खेडे हे दान दिले हा या ताम्रपटामागील मुख्य उद्देश होता. या ताम्रपटात राष्ट्रकुट घराण्याचा संस्थापक दंतीदुर्ग राजा कृष्णराज प्रथम ते राष्ट्रकुट वंशातील राजांची वंशावळी असा बाणवंशी राजा मेरू पर्यंतचा इतिहास मांडण्यात आला आहे. गोदावरील तिरावरील पईठ्ठाण गावावरून पैठणला पैठण नाव पडले. खईरोंढीवरून खिरई, नंदोकरग्रामवरून आगर नांदूर, पिंपलग्रामवरून पिप्पवाडी, कृष्णा व पंचगंगा संगमावरील कुरुंदवाड, मान्यखेट मालखेड अशी गावांची ओळख या ताम्रपटात देण्यात आली आहे.