ठाणे : जादा परताव्याचे अमीष दाखवून १ हजार २१६ जणांची ५७ कोटी ८९ लाख ३७ हजार ३७१ रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने श्रीकुमार पिल्लई याला अटक केली असून त्याची बँक खाती गोठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. फसवणूकीची रक्कम ७० कोटीपर्यंत जाऊ शकते. अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा : Maharashtra News Live : महाराष्ट्रातील विविध घडामोडींची माहिती एका क्लिकवर

श्रीकुमार पिल्लई याने एस. कुमार ज्वेलर्स आणि एस. कुमार गोल्ड ॲन्ड डायमंड या नावाने सराफा व्यवसाय सुरू केला होता. देशातील विविध राज्यात त्याने त्यासाठी कार्यालये थाटली होती. या दुकानांमध्ये सोने खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या कर्मचारी आणि दलालांमार्फत ११ महिने रक्कम भरल्यास १२ व्या महिन्यांची रक्कम ही आमच्याकडून भरण्यात येईल. त्या रकमेचे सोने खरेदी करता येऊ शकते. तसेच एक वर्ष मुदतठेवी पोटी रकमेवर परतावा म्हणून १६ ते १८ टक्के दराने व्याज मिळेल अशा विविध योजना सांगितल्या जात असत. त्यामुळे हजारो गुंतवणूकदारांनी पिल्लईकडे गुंतवणूक केली होती.

हेही वाचा : सेवा पुरवठा कंपन्यांच्या फसवणुकीत डोंबिवली पलावा मधील एम. टेक. इंजिनीअरचा सहभाग

कल्याणमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीनेही १० हजार रुपये या कंपनीकडे गुंतवले होते. परंतु त्याला परतावा मिळत नसल्याने त्यांनी याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याआधारे, या कंपनीचे श्रीकुमार पिल्लई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर, याप्रकरणाचा समांतर तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता. दरम्यान, श्रीकुमार पिल्लई याला पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याने आतापर्यंत १ हजार २१६ जणांची ५७ कोटी ८९ लाख ३७ हजार ३७१ जणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी पिल्लईचे विविध बँकेतील २४ खाते गोठविले आहेत. त्यामध्ये १२ लाख ८४ हजार ४७६ रुपये होते. तसेच त्याच्या संरक्षित करण्यात आलेल्या मालमत्तेची किंमत ६० कोटी रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणात फसवणूकीची रक्कम ७० कोटीपर्यंत जाऊ शकते. असेही पोलिसांनी सांगितले.