महात्मा गांधीजींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा तथाकथित साधू कालीचरण महाराज याची चौकशी आता ठाणे पोलीस करणार आहेत. रायपूर आणि वर्धा पोलिसांनंतर आता नौपाडा पोलिसांनी कालीचरणचा ताबा घेतला आहे. महात्मा गांधींजींबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी कालीचरणच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरून कालीचरणवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्याची चौकशी होणार आहे. या अगोदर रायपूर आणि वर्धा पोलिसांनी कालीचरणची चौकशी केली होती. रायपूरमध्ये झालेल्या धर्मसंसदेत कालीचरण महाराज याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्यं केली होती. त्यामुळे देशभरात संतापाचं वातावरण होतं. त्यानंतर कालीचरणवर वेगवेगळ्या पोलीस स्थानकांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. अकोल्याचा अभिजीत सारंग कसा बनला कालीचरण महाराज?, जाणून घ्या शिक्षण आणि कुटुंबाविषयी काय आहे हे प्रकरण? छत्तीसगडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंसदेत देशभरातून धर्माचे अनुयायी आणि महामंडलेश्वर आले होते. या कार्यक्रमात कालीचरण महाराज आणि उपस्थित अन्य काही जणांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना शिव्या दिल्या. तसंच गांधींजींची हत्या केल्याबद्दल नथुराम गोडसेचे आभार मानल्याचाही आरोप करण्यात येत आहे. त्याचबरोबर या संसदेदरम्यान नथुराम गोडसेचं कौतुकही करण्यात आलं. त्यानंतर काल संध्याकाळी गांधीविरोधी वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराज यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या दोन दिवसीय धर्म संसदेला उपस्थित राहण्यासाठी आलेले छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हेही अचानक या कार्यक्रमातून निघून गेले.