उल्हास नदीत पावेशपाडा भागात शुक्रवारी सकाळी शहाड येथील सेंच्युरी रेयाॅन शाळेतील एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.सूर्यदेव यादव असे बुडून मरण पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो उल्हासनगर मधील धोबीघाट येथील रहिवासी आहे. सूर्यदेव आणि त्याचा मित्र आर्यन शर्मा शुक्रवारी सकाळी शाळेत जाण्याचे निमित्त करुन घरी काहीही न सांगता पावशेपाडा भागातील उल्हास नदी किनारी गेले. तेथे त्यांनी नदी पात्रात पोहण्याचा निर्णय घेतला.

सविस्तर वाचा – कल्याण : गणेशोत्सवात मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या पोलिसांच्या सूचना

सूर्यदेव आणि आर्यन नदी पात्रात पोहत असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने सूर्यदेव वाहून जाऊ लागला. तो बचावासाठी ओरडा करू लागला. आर्यनने त्याला वाचविण्यासाठी ओरडा सुरू केला. परिसरात कोणीही राहत नसल्याने त्यांच्या मदतीला त्यावेळी कोणी आले नाही. तोपर्यंत सूर्यदेव पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेला होता. आर्यनने म्हारळ पोलीस चौकीत येऊन घडला प्रकार सांगितला. तात्काळ पोलीस, म्हारळचे सामाजिक कार्यकर्ते विवेक गंभीरराव यांनी नदी किनारी धाव घेतली. त्यांनी सूर्यदेवचा शोध सुरू केला.

अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनी शोध सुरू केला. दुपारी तीन वाजता सूर्यदेवचा मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढण्यात जवान, पोलिसांना यश आले.