प्रधानमंत्री आवास योजनेत कल्याण तालुका सर्वोत्कृष्ट तर राज्य पुरस्कृत योजनांमध्ये अंबरनाथ तालुका प्रथम प्रधानमंत्री आवास योजनेते ग्रामीण भागात उत्कृष्ट कामगिरी केल्याने कल्याण तालुक्याला गौरवण्यात आले आहे. तर आवास योजनांच्या राज्य पुरस्कारांमध्ये अंबरनाथ तालुक्याला जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट तालुक्याला प्रथम पारितोषीक मिळाले आहे. केंद्र शासनाच्या सर्वांसाठी घरे अंतर्गत ठाणे जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री महा आवास ग्रामीण अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना राज्याचे सार्वजनिक बांधकाम व अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सर्वांसाठी घरे या केंद्र शासनाच्या धोरणानुसार आवास योजनांच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागात बेघरांना घर दिले जाते. ग्रामीण आणि शहरी भागात या योजनांना गतीने पूर्णकरण्यासाठी आणि या योजनांच्या अंमलबजावणीत गुणवत्ता वाढण्यासाठी शासनाने विविध प्रयत्न केले. त्यात महाआवास अभियान राबवण्यात आले होते. राज्यात २० सप्टेंबर २०२१ ते ३० जून २०२२ या काळा राबवलेल्या या अभियानात आवास योजनांचे मूल्यमापन करण्यात आले. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना महाआवास अभियान पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनातील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यातील आवास योजनांमध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पुष्पा पाटील, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे महापालिकेचे आयुक्त बिपीन शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार, विषय समिति सभापती श्रेया गायकर , वंदना भांडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यात प्रधानमंत्री आवास योजनेत सर्वोत्कृष्ट ठरल्याने कल्याण तालुक्याला प्रथम क्रमांक मिळाला. तर अंबरनाथ आणि मुरबाड यांना अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळाला. समुह विकासात मुरबाड तालुक्यातील झाडघर, शहापुरातील साकडबाव आणि भिवंडीतील एकसाल या ग्रामपंचायतींना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळाला. तर सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारात मुरबाड तालुक्यातील ग्रामपंचायत उचलेला प्रथम, अंबरनाथमधील वांगणीला द्वितीय तर शहापुरातील खर्डीला तृतीय पुरस्कार मिळाला. राज्य पुरस्कृत योजनेत अंबरनाथ तालुक्या सर्वोत्कृष्ट ठरला. त्याखालोखाल कल्याण आणि शहापूर तालुक्याचा गौरव झाला.राज्य पुरस्कृत पुरस्कार सर्वोत्कृष्ट क्लस्टर –प्रथम क्रमांक -कोळोशी, तालुका मुरबाड,द्वितीय क्रमांक -आवाळे, तालुका शहापूर,तृतीय क्रमांक -दाभाड, तालुका भिवंडी. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत –प्रथम क्रमांक- ग्रामपंचायत वैशाखरे, तालुका मुरबाड,द्वितीय क्रमांक -ग्रामपंचायत चामटोली, तालुका अंबरनाथ,तृतीय क्रमांक- ग्रामपंचायत कोशिंबे, तालुका भिवंडी.