उल्हासनगर: करोनाच्या पहिल्या लाटेत कल्याण आणि उल्हासनगर यांसारख्या शहरात भारतीय प्रशासकीयसेवेतील वैद्यकीय पार्श्वभूमी असलेल्या डॉ. विजय सूर्यवंशी आणि डॉ. राजा दयानिधी यांची नेमणूक झाली होती. मात्र दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर या दोन्ही महापालिका आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तपदी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांची तर उल्हासनगर महापालिका आयुक्तपदी अजीज शेख यांची बदली करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात दोन्ही महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर या बदल्या महत्वाच्या मानल्या जात आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका आणि उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांची नुकतीच बदली झाली आहे. करोनाच्या पहिल्या लाटेत दोन्ही शहरांवर भारतीय प्रशासकीय सेवेतील आणि वैद्यकीय पार्श्वभूमी असलेल्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त पदी डॉ. विजय सूर्यवंशी यांची तर उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. राजा दयानिधी यांची नेमणूक झाली होती. करोना काळात जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे या नेमणुकीसाठी आग्रही होते, अशी चर्चा होती. त्यानंतर या दोन्ही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दोन्ही शहरांमध्ये करोना नियंत्रणाचे काम प्रभावीपणे झाले. उल्हासनगर शहर देशातील अत्यंत दाटी-वाटीच्या शहरांच्या यादीत अग्रस्थानी मानले जाते. या शहरात कोरोना प्रतिबंध करण्यास मोठ्या प्रमाणावर यश आले. मात्र करोना वगळता इतर कामांमध्ये डॉ. राजा दयानिधी छाप पाडू शकले नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यापासून दयानिधी यांनी बचावात्मक भूमिका घेतल्याचा आरोप होत होता. तर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना नियंत्रण मोहीमेत बहुतांशी यश आल्याचे बोलले जात होते. या दोन्ही आयुक्तांच्या रूपाने दोन्ही शहरांना भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी लाभले होते. डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या जागी अनेकदा मुख्याधिकारी गटातील अधिकाऱ्यांची वर्णी लावल्याच्या चर्चा अनेकदा झाल्या. मात्र अखेर ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त पदी निवड झाली आहे. गेल्या काही महिन्यात भारतीय प्रशासकीय सेवेतील डॉ. दांगडे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे सूर जुळल्याचे चित्र होते. दोघांनी ग्रामीण भागात अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावले. त्यामुळे डॉ. दांगडे यांची झालेली निवड याच माध्यमातून झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तर उल्हासनगर महापालिका आयुक्तपदी नियुक्त झालेले अजीज शेख यांच्या नावाची चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरू होती. अजीज शेख भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असलेल्या डॉ. राजा दयानिधी यांची जागा घेणार आहेत. अजित शेख मुख्याधिकारी संवर्गातील निवड श्रेणी अचे अधिकारी आहेत. ते यापूर्वी धुळे महापालिका आयुक्त होते. गेल्या काही दिवसांपासून ते नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. त्यामुळे उल्हासनगर शहराला पुन्हा एकदा मुख्याधिकारी दर्जाचा अधिकारी मिळाला आहे. दोन्ही महापालिकांमध्ये येत्या काळात निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. दोन्ही पालिकांचे प्रभाग रचना, आरक्षण आणि मतदार याद्यांचा कार्यक्रम नुकताच पूर्ण झाला आहे. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर या दोन्ही आयुक्तांची निवड महत्त्वाची मानली जाते आहे.