शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांनो आम्ही व्यासपीठावर एकत्र बसलो आहोत. विकासकामांचे नारळ एकत्र फोडतोय. मग तुम्ही कार्यकर्ते व्यासपीठाच्या खालून बेंबीच्या देठापासून कशासाठी पक्षीय घोषणा देता. जरा शांततेने घ्या. कोंबडं झाकल म्हणून उगवायच राहत नाही. तेव्हा घोषणा जरूर द्या, पण विकासाचे कोंबडे कसे उगवेल याकडे प्राधान्याने लक्ष द्या, असा कानपिचक्या केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांनी येथे मंगळवारी शिवसेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांना दिल्या.

कल्याण पश्चिमेत रौनक सिटी गृहसंकुल परिसरात स्मार्ट रोडचे उद्घाटन केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार गणपत गायकवाड, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार बालाजी किणीकर, आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी, शहर अभियंता सपना कोळी यांच्या उपस्थितीत झाले. या कार्यक्रमात शिवसैनिकांनी शिवसेनेचा नारा देऊन आसमंत दणाणून सोडला. खासदार श्रीकांत शिंदे यांचा जयघोष सुरू होता. उपस्थित भाजपा कार्यकर्ते भाजपाचा नारा देत कपील पाटील यांचा जयघोष करत होते. बराच वेळ ही घोषणाबाजी चढाओढीने सुरू होती. हे सहन न झाल्याने कपिल पाटील यांनी ध्वनीक्षेपकाचा ताबा घेतला आणि सेना, भाजपच्या कार्यकर्त्यांना जिव्हारी लागतील अशा कानपिचक्या दिल्या.

कल्याण डोंबिवलीत स्मार्ट सिटीची कामे केंद्र, राज्य आणि पालिकेच्या हिश्श्यातून सुरू आहेत. विकासकामांमध्ये प्रत्येक सरकारचा हिस्सा आहे. व्यासपीठावर शिवसेना-भाजपा भेदाभेद न करता आम्ही एकत्र, खुर्चीला खुर्ची लावून बसलो आहोत.विकासकामांचे नारळ फोडत आहोत. कार्यक्रमात चढाओढीच्या घोषणा कशासाठी? कोंबडं झाकून ठेवले म्हणून उगवायचं राहत नाही. सूर्य उगवला पाहिजे. कोणाच्या तरी पुढाकाराने, प्रयत्नाने कामे होत आहेत ना याकडे लक्ष ठेवा आणि विकासकामांनी आपले शहर, परिसर सुशोभित होईल याकडे लक्ष द्या, अशा कानपिचक्या केंद्रीय मंत्री पाटील यांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिल्या.

भाजपाचे व्याज

यापूर्वी कधी नव्हे मिळाला एवढा एक हजार कोटीचा निधी दोन वर्षात कल्याण, डोंबिवलीला विकास कामांसाठी मिळाला. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा नामोल्लेख टाळून आता बँक आपल्या ताब्यात आहे. निधीत कमतरता नाही. पक्षीय भेद न करता पालकमंत्री शिंदे निधीचे वाटप करतात. सर्व भागाचा शाश्वत विकास होत आहे, असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण पूर्वेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक भूमिपूजन सोहळ्यातील भाषणात सांगितले. तसेच, बाबासाहेबांच्या स्मारकासाठी कसा निधी आणला, पाठपुरावा केला हे तारीखवार सांगितले. त्याला उत्तर देताना मंत्री पाटील म्हणाले, बँकेतून कर्ज घेताना अगोदर पाच ते १० टक्के भरणा करावा लागतो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना स्मारकासाठी गणपत गायकवाड यांनी ५० लाख मंजूर करून घेतलेत. ते शासन तिजोरीत आहेत. या ठेव रकमेवर तुम्हाला आताचा निधी मिळाला आहे, असे सांगून खासदार, पालकमंत्री यांना कोपरखळी मारली.

आमदार गायकवाड यांनी स्मारकाचे श्रेय खासदारांनाच दिले आहे. खासदारांच्या प्रयत्नाने स्मारक मार्गी लागले आहेत. यात संदेह नाही. त्यामुळे खासदारांनी तारीखवार स्मारक पाठपुराव्याची जंत्री वाचली नसती तरी चालली असती, असे मंत्री पाटील म्हणाले आणि उपस्थितांमध्ये खसखल पिकली.