खारेगावमध्ये राहणारे आणि कळवा स्टेशनवरून रोज लोकल पकडून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल कुत्रा खात नाही असे आहेत. पण करणार काय? सहन करणे, रोज मृत्यूचे फाटक ओलांडणे, रस्ता नसलेल्या मार्गावरूनच प्रवास करणे हे नित्याचे झाले आहेत. हेही दिवस जातील या आशेवर हा प्रवासी माणूस सध्या सहन करतो आहे. दिवस बदलतील अशी कामे सुरू आहेत त्यासोबत नेत्यांची आशादायी होर्डिंग्जही या भागात लागतात त्यामुळे बिचाऱ्या प्रवाशांची भाबडी आशा आहे.

कळवा आता मुंब्य्रापर्यंत वाढत गेले. खारेगाव भागात मोठी लोकवस्ती वाढली तर मफतलाल परिसरातही झोपडय़ा आणि बांधकामे झाल्यामुळे कळवा स्टेशनवर प्रचंड गर्दी होते. खारेगावमधील रहिवाशांना रोज रेल्वे फाटक ओलांडूनच प्रवास करावा लागातो. रोज लाखो प्रवासी, माहिला, विद्यार्थी ही जीवघेणी कसरत करतात. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उड्डाण पुलाचे काम सुरू झाले, पण त्याने कासवापेक्षा जास्त गती पकडलेली नाही. हा परिसर  मफतलाल जागेत येतो. त्यामुळे एक चिंचोळा रस्ता गेली अनेक वर्षे होता ज्यावरून खाजगी रिक्षा शेअरमध्ये चालवत काहीजपण प्रवाशांना रेल्वे स्टेशनपर्यंत सोडतात. त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. या रस्त्याच्या खालून मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम गेले दीड वर्ष सुरू आहे. या काळात तर कंत्राटदाराने पूर्ण रस्ताच बंद करून टाकला, त्यामुळे दोन किमीच्या अंतरासाठी रिक्षावाले सुमारे पाच किमीचे अंतर कापत तेही मफतलालच्या जागेतील कच्च्या रस्त्यावरून प्रवाशांना सोडत होते. या भागात पोलीस कधी फिरकत नाहीत. सगळे काही स्वयंशिस्तीने सुरू आहे. विशेष म्हणजे आता रस्त्याचे काम पूर्ण होत आले तरी गर्भवती महिला या भगातून रिक्षातून प्रवास करू शकत नाहीत अशी स्थिती रस्त्यांची आहे. रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतरच्या चौकात रिक्षांची गर्दी, प्रचंड मोठे खड्डे त्यामध्ये साचलेले पाणी आणि फेरीवाल्यांची वाढती संख्या आणि दिवाबत्तीही नसल्यामुळे भयाण अंधारात  प्रवासी वावरत असतात. अत्यंत दयनीय अवस्थेत हा परिसर गेली अनेक वर्षे आहे. एकीकडे कळवा स्टेशनच्या विस्ताराचे काम सुरू आहे. रेल्वेचे रुंदीकरण सुरू आहे तर दुसरीकडे कामांची गती कमी असल्यामुळे सध्या प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे.  गेले दीड ते दोन वर्षे या भागात रस्त्याचे काम जेव्हा सुरू होते त्यावेळी तर अत्यंत हाल सहन करत प्रवासी प्रवास करत होते. या भागात फक्त झळकतात ती नेत्यांच्या वाढदिवसांची होìडग्ज.

या रिक्षा खाजगी आहेत.. रस्ता खराब असल्यामुळे रिक्षा कधी उलटतात.. कधी बंद पडतात पण पर्याय नाही. एक तर चिखल, पाणी आणि अंधरातून चालत जाणे किंवा शेअर शिक्षासाठी तासभर उभ राहयचे आणि पंधरा मिनिटाचा प्रवास करायचा.. एक तर संध्याकाळी मुंबईवरून परतणारा प्रवासी तासभर उभ्याने गर्दीत चेंगरून कसाबसा कळव्याला उतरतो आणि त्यांनतर पुन्हा रिक्षाची रांग. मग रेल्वे फाटक.. तिथेही दिवे असतीलच असे नाही. असा जीवघेणा त्रास प्रवासी सहन करतो आहे.  सुविधांचा दर्जा सुधारतो आहे हे सत्य आहेच त्यामुळे भविष्यात हे चित्र कधी तरी बदलेल पण एवढे प्रवासी रोज प्रवास करतात. महिलासुद्धा रात्री उशिरापर्यंत या भागातून प्रवास करतात. पण या भागात कधीतरी गस्त घालावी म्हणून पोलिसांना वाटत नाही. रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडताना चिखल, खड्डे आणि ढोपरभर पाणी असे चित्र असताना त्यामध्ये नुसती खडी टाकली तरी प्रश्न सुटेल असे असतानाही ना रेल्वे, महापालिका प्रशासन अथवा होìडग लावणाऱ्या लोकप्रतिनिधींना एवढे करावेसे वाटू नये हे दुर्दैवी आहे.